पवना , मुळशी, वडीवळे धरणातून विसर्ग वाढविला!

पिंपरी : पवना धरण 96% भरलेले असून, पवना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता दुपारी 3 वाजता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये 4820 क्युसेक क्षमतेने विसर्ग चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावर पाऊस पडत असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.
पावसाचे प्रमाण व येवा पाहता हा विसर्ग 7500 क्युसेक पर्यंत टप्पा टप्प्याने वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतची आवश्यक माहिती विसर्गापूर्वी देण्यात येईल. सततच्या होणाऱ्या पर्जन्यामुळे ओढे व नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. पवना नदी खोऱ्यातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे. पवना धरण प्रकल्प पवनानगर
यांनी दिला आहे.

मुळशी धरण ८५% भरले
मुळशी धरण ८५% भरले असून पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे आणि पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 8100 Cusecs ने विसर्ग सुरू होता, दुपारी १:०० वाजता 10000 Cusecs करण्यात आला आहे तसेच पाऊस चालू,,वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग बदल करण्यात येईल अशी माहिती सुरेश कोंडूभैरी टाटा पॅावर मुळशी धरण यांनी दिली आहे.
वडीवळे धरण, 99.47% भरले
वडीवळे धरण 99.47% भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी वडीवळे धरणाच्या सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे नदीपात्रामध्ये 3592 क्युसेक इतका विसर्ग 5773 क्युसेक सुरू करण्यात आला आहे अशी माहिती दि. म. डुबल कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग, पुणे यांनी दिली आहे,
कासारसाई धरण ९८% भरले
कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने व पाणलोट क्षेत्रातून येवा येत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कासारसाई धरण सध्या ९८% भरले आहे. कासारसाई धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी दुपारी ४.३० वाजता कासारसाई धरणाच्या सांडव्याच्या वक्रद्वारांद्वारे कासारसाई नालापात्रात ७५० क्युसेक्स इतका सुरु असणारा विसर्ग वाढवून १५०० क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. पाऊस चालू, वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी ,जास्त करण्यात येईल अशी माहिती दि.म.डुबल, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग यांनी दिली.
पाऊस सुरू राहिल्यास अथवा वाढल्यास तसेच धरणामध्ये येव्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास परिस्थितीनुसार सदर विसर्गामध्ये कमी अथवा जास्त बदल करण्यात येऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी. तरी नागरिकांनी नाला अथवा नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रातील साहित्य, वाहने व जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. तसेच सखल भागातील नागरिकांना त्वरित सूचना देऊन सर्वांनी आवश्यक ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

