फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

ओबीसींना आर्थिक निधी मिळावा

ओबीसींना आर्थिक निधी मिळावा

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी; महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : इतर मागासवर्गीय प्रवर्गाला (ओबीसी) केवळ राजकारणासाठी आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून आर्थिक फंड मिळावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केली.

महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला. त्या वेळी भुजबळ बोलत होते. राज्याचे दुग्धविकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, आमदार शंकर जगताप, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, भाऊसाहेब भोईर, सदाशिव खाडे, बाळासाहेब वाल्हेकर, माधवी राजापुरे, वसंत लोंढे, सुरेश भोईर, रेखा दर्शिले, संगीता ताम्हाणे, चेतन भुजबळ, प्रा. कविता आल्हाट, डॉ. नागेश गवळी, मोहन भूमकर या वेळी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, आपल्याला जे हवे ते माळी, वंजारी म्हणून मिळणार नाही. ओबीसी म्हणूनच मिळेल. मात्र, आदिवासी व दलित ज्याप्रमाणे संघटीत आहेत त्या प्रमाणे ओबीसी संघटीत नाहीत. त्यांची मोट बांधण्याचे काम करावे लागणार आहे. तीव्र मागणी करून सरकारला जागे करावे लागणार आहे.

महात्मा फुले यांनी ब्राह्मणांविरुद्ध नव्हे तर ब्राह्मणवाद आणि अंधश्रद्धा यांच्याविरोधात काम केले. पुढे काही मंडळींनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढविला. मात्र, महात्मा फुले समजून घ्यायचे झाल्यास त्यांचे शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी यांसारखी पुस्तके वाचायला हवीत, असे भुजबळ यांनी सांगितले.

राज्यातील महायुती सरकार सावित्रीबाई फुले यांचे काम पुढे नेत आहे. लाडकी बहीण योजना, विद्यार्थीनींना शिक्षणासाठी मदत हा त्याचाच भाग आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकले. त्यांना दगड मारणारे सनातनी होते आणि आमचेही होते. कारण अंधश्रद्धेचा पगडा होता. कर्मठ ब्राह्मण असे आपण म्हणतो मात्र, सावित्रीबाईंच्या पहिल्या शाळेला जागा भिडे यांनीच दिली. परांजपे, भांडारकर हे महात्मा फुले यांच्या बांधकाम कंपनीत भागीदार होते, असे भुजबळ यांनी नमूद केले.

सावे म्हणाले, महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थीनींची स्पर्धा परिक्षेची तयारी करून घेतली. ओबीसींसाठी ५६ वसतीगृहे बांधली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरणला अ दर्जा देऊन शंभर कोटी रुपये दिली. त्याबाबतचा आराखडा तयार झाला असून, लवकरच काम सुरू होईल. पुण्यातील भिडे वाडा तसेच अरण प्रश्न मार्गी लागला आहे. नायगाव येथे सावित्रीबाई फुले स्मारक उभे राहत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले. महादेव भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत ताम्हाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अनिल साळुंके, प्रशांत डोके, विश्वास राऊत, नीलेश डोके, राजेश कर्पे, भरत आल्हाट, संजय जगताप, प्रकाश जमदाडे, नितीन ताजणे, नरहरी शेवते, विजय दर्शले, अनिता ताठे, आशा माळी, उर्मिला भुजबळ, स्मिती माळी, अलका ताम्हाणे यांनी पुढाकार घेतला.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये रुपाली चाकणकर, आशा तळेकर, मालती भूमकर, भाग्यश्री भाग्यवंत, रेश्मा शेख, पूजा डोके, अनिता टिळेकर, मंगल आहेर, वैशाली खराडे, पूनम गुजर, सुवर्णा कदम, पल्लवी मारणे, रेश्मा कणसे, वंदना आल्हाट, संध्या स्वामी, रेणुका हजारे, हर्षदा भावसार, शुभांगी झोडगे, महानंदा घळगे, नीलम चव्हाण, अॅड. जया उभे, संगीता येवला यांचा समावेश होता.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"