लोणावळ्यातील ठोकरवाडी धरणातून शहराला पाणी आणण्याचे नियोजन!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन लोणावळ्याजवळील ठोकरवाडी धरणातून 600 एमएलडी पाणी शहरासाठी आणण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. चिंचवड येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सध्या पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. गेल्या सहा वर्षांपासून नागरिकांना दिवसाआड पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.सध्या पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून 550 एमएलडी पाणी घेतले जात आहे. अंध्रा धरणातून इंद्रायणी नदी बंधाऱ्यावरून 100 एमएलडी पाणी उचलले जात आहे. भामा आसखेड धरणातून भूमिगत जलवाहिनीद्वारे 167 एमएलडी पाणी आणण्याचे काम सुरू असून हे पाणी शहराला फेब्रुवारी 2027 पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहराचे 2041 पर्यंतचे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे . पाण्याचे स्त्रोत वाढवण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्पासाठी 1200 कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला 750 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तो प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
आंध्रा धरणातून थेट पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनी सुरू करण्याची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे शहराला शंभर एमएलडी शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. ठोकरवाडी धरणात जलविद्युत निर्मिती केली जाते. तेथून शहराला सहाशे एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

