मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना

पंढरपूर, प्रतिनिधी : आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली असताना राज्यातील वारकऱ्यांसाठी शासनाने आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याची. या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय रविवारी (१४ जुलै) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे. महामंडळ कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भाग भांडवल ५० कोटी रुपये असणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी
करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महामंडळाच्या प्रस्तावित योजना
राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे.
सर्व पालखी सोहळ्याच्या मार्गांची सुधारणा करणे
स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी आर्थिक तरतूद
आषाढी व कार्तिकीसाठी वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच
वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यासाठी अनुदान
कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना
आषाढी व कार्तिकीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान
पंढरपूर ,देहू ,आळंदीसह प्रमुख तीर्थक्षेत्रांचा विकास
चंद्रभागा, इंद्रायणी ,गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्तीबाबत कार्यवाही
महिन्याला पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन योजना
संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणे
…..