श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान २९ जूनला
प्रतिनिधी, पिंपरी – आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे यंदा २९ जूनला आळंदीहून प्रस्थान होणार आहे. पुणे आणि सासवडला प्रत्येकी दोन दिवसांचा मुक्काम असून, लोणंदला अडीच दिवसांचा पालखी मुक्काम असणार आहे.
पंढरपूर येथील आळंदी देवस्थानच्या माऊली मंदिर मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेची बैठक झाली. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीला आळंदी संस्थान समितीचे मुख्य विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विठ्ठल महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, माऊली महाराज जळगांवकर, भाऊसाहेब गोसावी, भाऊसाहेब फुरसुंगीकर, राजाभाऊ थोरात, माऊली वीर, राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे उपस्थित होते.
बैठकीत दिंडी समाज संघटनेतर्फे उमाप आणि निरंजननाथ यांचा सत्कार करण्यात आला. यंदा श्रींचे पालखी प्रस्थान आळंदी मंदिरातून शुक्रवारी २९ जूनला होईल, अशी माहिती यावेळी निरंजननाथ यांनी दिली. ते म्हणाले की, पुणे आणि सासवडला दोन दिवस तसेच लोणंद येथे सोहळ्याचा अडीच दिवस पालखीचा मुक्काम राहील. पंढरपूर येथे १७ जुलैला आषाढी एकादशी सोहळा असणार आहे.
पालखी सोहळ्याच्या प्रवासात पुण्यात संगमवाडी ते भवानी पेठ तसेच निंबोरे ओढा ते फलटण विमानतळ अंतर पायी वारीतील वाटचालीस तुलनेने जास्त आहे. यामध्ये सुवर्णमध्य काढून सोहळ्याला अर्ध्या तासाचा विसावा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. प्रवासात विसावा वाढल्यास रात्रीच्या समाज आरतीस उशीर होतो. याबाबत विचार करून नियोजन करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असे संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बैठकीत पालखी मार्गासंदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर दुतर्फा झाडे लावावीत, – वाखरी-पंढरपूर रस्त्याचे काम वेळेत व्हावे, बरड, वेळापूरची वाहतूक कोंडी टाळावी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रभावी असावी या प्रमुख मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
हे ही वाचा – https://tothepoints.org/sant-tukaram-maharaj-palkhi-departure-on-28th-june-from-dehu/