विकासकामे, अतिक्रमण नियंत्रण, नालेसफाई कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आणि अतिक्रमणांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. शहराच्या नियोजनाला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच कारवाई करून मोकळ्या करण्यात आलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून त्या ठिकाणी मुलांसाठी खेळाची मैदाने विकसित करावीत तसेच वृक्षलागवड करून हरित क्षेत्र निर्माण करावे, असे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहर विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा, नागरिकांशी संबंधित मूलभूत समस्या, पावसाळ्यापूर्व तयारी , विविध विभागांमधील समन्वय याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, अजय सूर्यवंशी, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सिताराम बहुरे यांच्यासह अ, ब, क, ड, ई, फ, ग व ह क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रीय अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
शहराच्या नियोजनावर परिणाम करणारी बेकायदा बांधकामे वेळेत रोखली गेली नाहीत, तर भविष्यात गंभीर नागरी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून नव्याने सुरू होणाऱ्या बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम निदर्शनास येताच कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाई करावी, असे निर्देशही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नालेसफाईची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात यावा. नालेसफाईच्या कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष द्यावे तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. यासोबतच नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारी नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवून पाण्याचा नैसर्गिक निचरा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत शहरातील पाणी चोरी रोखण्यासाठी उपाययोजना, विविध भागांतील पाणी समस्यांचे निराकरण, कामगार कट्ट्यांचे नियोजन, संभाव्य पूर व्यवस्थापन, उद्यानांची देखभाल, रस्त्यांच्या दुभाजकांमधील वृक्षांचे संवर्धन तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित कामांतील त्रुटी दूर करून अधिक समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

