फक्त मुद्द्याचं!

26th March 2026
पिंपरी-चिंचवड सामाजिक

भारतीय उत्पादने कमी प्रतीची, हा गैरसमज दूर करण्यासाठी जागरूक दृष्टी वाढवणे गरजेचे!

भारतीय उत्पादने कमी प्रतीची, हा गैरसमज दूर करण्यासाठी जागरूक दृष्टी वाढवणे गरजेचे!

सामर्थ्यशाली भारत : डॉ. उदय निरगुडकर यांच्या विचारप्रवर्तक व्याख्यानाचा थरारक अनुभव
चिंचवड : मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले ते जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान. ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावर त्यांनी मांडलेले विचार केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता श्रोत्यांच्या चिंतनाला चालना देणारे होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक, तरुण, विद्यार्थी आणि विचारप्रेमी उपस्थित राहिले.

viara vcc
viara vcc

व्याख्यानापूर्वी पिंपरी-चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव आणि केशव विद्वास यांनी डॉ. उदय निरगुडकर यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी भारताच्या वर्तमान घडामोडी, सामाजिक दृष्टीकोन, आर्थिक स्थिती आणि जागतिक पातळीवरील भारताच्या वाढत्या प्रभावावर अत्यंत नेमके पण तितकेच प्रभावी भाष्य केले.

स्वतःकडे आणि आपल्या समाजाकडे पाहताना अनेकदा चुकीच्या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीत समाजाकडे अनेक गैरसमज आहेत — जणू काही व्यवसाय म्हणजे केवळ नफा कमावण्याचे साधन आणि समाजासाठी असणारी जबाबदारी गौण. हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बाहेरील गोष्टी आपल्यापेक्षा अधिक उत्तम आणि भारतीय बनावटीची उत्पादने कमी प्रतीची, हा गैरसमज दूर करण्यासाठी आत्मविश्वास आणि जागरूक दृष्टी वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जग पाहताना जागृत आणि सकारात्मक दृष्टी ठेवली, तर भारताच्या प्रगतीची वास्तविकता कुणाच्याही नजरेतून सुटू शकत नाही. भारताची जनता राष्ट्राभिमानी, कर्तव्यनिष्ठ आणि दृढनिश्चयी असेल तर राष्ट्र निश्चितच महासत्ता बनू शकते, हे त्यांनी ठामपणे सांगितले. समाजाची एकजूट आणि सामूहिक निर्धार हेच राष्ट्राच्या सामर्थ्याचे खरे स्तंभ असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

ज्ञान हेच राष्ट्रनिर्मितीचे प्रमुख साधन असल्याचा उल्लेख करत त्यांनी गेल्या ३५ वर्षांत भारताच्या सॉफ्टवेअर निर्यातीने सौदी अरेबियाच्या क्रूड ऑईल एक्स्पोर्टलाही मागे टाकल्याची अभिमानास्पद नोंद मांडली. आधुनिक जगात भारताने हे साध्य केले आहे, ही गोष्ट भारतीय कौशल्य, शिस्त, जिद्द आणि एकाग्रतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारी ‘अलेक्सा’ तयार करणारा वैज्ञानिक धैर्य दंड हा नाशिकमधील एका साध्या कुटुंबातील भारतीय युवक आहे, हा उल्लेख करत त्यांनी भारतातील प्रतिभेची खोली आणि सामान्य कुटुंबांमधूनही जागतिक नेते तयार होऊ शकतात, याची जाणीव श्रोत्यांना करून दिली. भारतीय संशोधक आणि उद्योजक जगाला नवनवीन उपाय देत आहेत; हा आधुनिक भारताचा खराखुरा चेहरा आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

व्याख्यानाचा शेवट राष्ट्राभिमान, सकारात्मकता आणि कर्तृत्वाची प्रेरणा देणाऱ्या संदेशाने झाला. समाजातील प्रत्येक घटक जागृत, आत्मविश्वासी आणि प्रामाणिक असेल तर भारताचे भविष्य उज्ज्वलच नव्हे तर जगात मार्गदर्शक ठरू शकेल, असे विचार मांडत त्यांनी श्रोत्यांच्या मनावर ठसा उमटवला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"