राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये दणका!

अजित गव्हाणे यांच्यासहविविध पक्षातील आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील अजित गव्हाणे यांच्यासह भोसरी विधानसभेतील विविध पक्षातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. यावेळी भाषण करताना अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने फटकेबाजी केली. आज अजित पवारांनी येथील आमदार विलास लांडे यांचा संदर्भ देत भोसरी नावावरुन म्हण सांगत मिश्कील टोलेबाजी केली.
या पक्षप्रवेश सोहळ्याला विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, भोसरी विधानसभेचे माजीआमदार विलासशेठ लांडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश बहत आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार रुजलेले आहेत,आपण तेच विचार घेऊन पुढं जातोय. मधल्या काळात आपलेच पदाधिकारी घेऊन त्यांना पदं देऊन इथं बदल घडवला. भाजपचे दिवंगत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना उद्देशून अजित पवारांनी भाजपला टोला लगावला. तसेच, काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, ते शरीराने तिकडं होते, मनाने मात्र आपल्यासोबत होते हे मला ही जाणवत होतं. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजित गव्हाणे माझ्या संपर्कात होते. आता आम्हाला मान-सन्मान द्या, अशी चर्चा माझ्याशी होत होती, अशी आतली बातमी अजित पवारांनी सांगितली.

भोसरी संदर्भात बोलताना मिश्कील टिपण्णीही अजित पवारांनी केली. एक गाव भोसरी अन् दहा गावं दुसरी असं विलास लांडे म्हणाले. पण, दहा नव्हे तर बारा गावं दुसरी.पण हे विलास म्हणाला. म्हणून मी अजित गव्हाणेला किती वेळा सांगत आलोय, अरे बाबा तू विलासचे ऐकत नको जाऊ, असा मिश्कील टोलाही अजित पवारांनी पक्षप्रवेश सोहळ्यातून लावला. असा मिश्कील सवाल अजित पवारांनी विचारला. त्यावर, उपस्थितांनी हसून दाद दिली.
निवडणुका न झाल्याच फटका लोकसभेला बसला
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या, त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला. कारण गल्ली बोळातील, गाव-खेड्यातील लोकं थेट खासदारांकडे कसे काय येणार? ते स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जातात. मात्र, निवडणुका लागतील, या आशेपोटी ते वारेमाप खर्च करुन करुन थकले. मग याचा लोकसभेवेळी त्यांचा फटका बसला. आता निष्ठावान म्हणतात आमचं काय? पण आमची निष्ठा तुमच्यावर आहे अन् तुमची निष्ठा आमच्यावर आहे. आगामी पालिका निवडणुकांमध्ये 4 चे प्रभाग होण्याची शक्यता दाट आहे, त्या अनुषंगाने कामाला लागा अजित पवारांनी सांगितले.
2029 ला मतदारसंघाची फेररचना होणार
महाराष्ट्रात कोण म्हणतं आमच्या जातीचे 1 कोटी लोकं आहेत, कोण म्हणतं 2 कोटी, अगदी कोण-कोण तर म्हणतात 4 कोटी आमची लोकसंख्या आहे. म्हणजे या सर्व जाती धर्माची बेरीज केल्यावर महाराष्ट्राची लोकसंख्या 40 ते 50 कोटींवर जाऊन पोहचते. त्यामुळे एकदा प्रत्येकाला कळू द्या, कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे. त्यासाठी जनगणना होऊन जाऊ द्या. त्यानंतर 2029 ला लोकसभा मतदारसंघाची फेररचना होणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.