छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात संपन्न!

उपमुख्यमंत्री सुनिताताई पवार यांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम
जुन्नर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात, जल्लोषात, जय भवानी जय शिवाजीच्या घोषात संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्म उत्सव पार पडला. उपमुख्यमंत्री सुनिताताई पवार यांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम होता. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा आजचा भूगोल आणि इतिहास आजच्यासारखा दिसला नसता. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. आज मला सांगताना आनंद वाटतोय की, युनेस्कोने 12 किल्ल्यांना वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. म्हणजेच छत्रपतीना जागतिक पातळीवर मान्यता असल्याचे दिसून आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाले आहेत हीच अजितदादांची इच्छा होती. तसेच 2030 साली छत्रपती शिवरायांची 400 वी शिवजयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करू असे जाहीर केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, यापूर्वी अनेक वेळा आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्याची संधी आली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले- शाहू -आंबेडकर विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही असे यावेळी आश्वासन दिले . अजितदादांना शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच, या किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. मागील अर्थसंकल्पात आग्रा, संगमेश्वर, रायगड, वढू बुद्रुक या ठिकाणी त्यांनी विशेष तरतूद केली होती. भावी पिढीला शिवरायांची प्रेरणा मिळावी हाच त्यामागील त्यांचा उद्देश होता असे त्यांनी सांगितले.
शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,सुनीताताई पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री अशी शेलार ,जुन्नरचे आमदार सोनवणे आणि इतर मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

