सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
परळी : आता फक्त दोन महिने राहिलेत. राज्यातलं सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार नवीन चेहरा शोधत होते. त्याच पार्श्वभूमीवर परळी येथील राजेभाऊ फड यांना पक्षात घेत पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. कन्हेरवाडी गावचे सरपंच आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते. फड हे परळी तालुक्यात सक्रीय आहेत.
पवार यांनी मुंडे यांच्या विरुद्ध फड यांना उमेदवारी दिली तर इथली निवडणूक हे मुंडे यांच्यासाठी आव्हान असेल, असे म्हटले जाते. फड यांच्या प्रवेशावेळी शरद पवार यांनी तसे बोलूनही दाखविले आहे.
ते म्हणाले की, परळी भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो. त्याविरुद्ध आवाज उठवला गेला तर त्याचा आवाज दाबला जातो. आतापर्यंत आमच्या नावावर काहीजण निवडून आले. आणि मग भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले. त्यांनी लोकांची फसवणूक केली आणि ते सत्तेत सहभागी झाले. परळीमध्ये मोठी सभा घेऊन या सगळ्याचे उत्तर देऊन दाखवू. आता फक्त दोन महिने राहिलेत.