केजरीवाल यांच्याकडे पर्याय नाही: भाजपा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढील दोन दिवसातच मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यानंतर देशभर विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटलं आहे की, केजरीवाल हे स्वतःहून राजीनामा देत नाहियेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. न्यायालयाने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून खडे बोल सुनावल्यानंतर त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय नाही. ते भ्रष्टाचारात इतके बुडाले आहेत की, आता तुम्ही मुख्यमंत्रिपदावर बसून सह्या करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सांगावं लागलं.
दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर केजरीवाल हे वेगवेगळ्या सभा व कार्यक्रमांमधून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत.