ताम्हिणी घाटात जाऊ नका!!

पुणे, प्रतिनिधी : ताम्हिणी घाटातील आदरवाडी आणि डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला आहे. परिणामी या भागातला रस्ता खचला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता येत्या सोमवारपर्यंत (५ ऑगस्ट) हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून पुणे आणि परिसरात राहणारे नागरिकच नव्हे, तर पुण्याबाहेरील शहरांमध्ये राहणारे अनेक नागरिक निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी ताम्हिणी घाटात येत असतात. ताम्हिणी घाटातील वनराई, धबधबे, घाटांमधून प्रवासाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची नेहमीच येथे गर्दी असते. पावसाळ्यामध्ये शनिवार आणि रविवार या दोन सुटीच्या दिवशी हमखास लोक या परिसरात येतात. मात्र रस्त्याच्या बाजूस गेलेला तडा आणि परिणामी खचलेला रस्ता हा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचा आहे. हे लक्षात घेऊन शुक्रवारपासूनच (२ ऑगस्ट) हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे.
ताम्हिणी घाटातील मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वरील साखळी क्रमांक ६१/६५० ते ६१/६८० दरम्यान रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. तसेच हा भाग ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येतो. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत.
पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ रस्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.