जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान!

पाऊली चालती पंढरीच्या वाटे!
देहू : ज्ञानोबा -तुकाराम, राम कृष्ण हरी जयघोषात ,टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भावपूर्ण वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान आषाढी वारीनिमित्त देहू मंदिर परिसरातून पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे झाले.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजाचा यंदा 341 वा पालखी सोहळा असून पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा, इनामदार वाड्यात तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन, सकाळी 10 ते दुपारी बारा या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर दुपारी इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळ वाड्यातील भजनी मंडपात आणण्यात आल्या. प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास यावेळी प्रारंभ झाला. त्यानंतर भक्तिमय वातावरणात ग्यानबा -तुकाराम यांच्या जयघोषात दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.
ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुका पूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात, चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी प्रदक्षिणेनंतर रात्रीच्या मुक्कामाला पालखी इनामदार वाड्यात असेल .बुधवार सकाळी पालखी सोहळा पिंपरी चिंचवड कडे मार्गस्थ होईल.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी पालखी सोहळ्यासाठी यंदा तयार करण्यात आलेल्या चांदी मढीतून नवीन रथ सेवेसाठी दाखल झाला आहे या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी देहू देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रम सिंग मोरे वैभव महाराज मोरे गणेश महाराज मोरे विश्वस्त उमेश महाराज मोरे लक्ष्मण महाराज मोरे कुंडलिक महाराज मोरे तसेच आजी-माजी विश्वस्त उपस्थित होते
गेली दोन दिवस पुणे जिल्हा, मावळ, देहू- आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने इंद्रायणी नदीला महापौर आला होता. आळंदी व देहू परिसरातील अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले होते. इंद्रायणी नदीची वाढती पाणी पातळी आणि मुसळधार पाऊस पाहता वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा त्या पुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासन, देहू देवस्थान संस्थान यांनी केले होते. परंतु या आवाहनाला वारकऱ्यांनी कोणताही प्रतिसाद न देता. देवनगरी देहू मध्ये वारकऱ्यांनी उत्साहात पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभाग घेतला. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी पावसाने उघडीप दिल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

