आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरी राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगुल!

नवी दिल्ली : केंद्रिय निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरी या राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यात नऊ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल चार मे रोजी जाहीर होतील .या राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे .मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पाचही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 17.4 कोटी मतदार आणि 824 जागा आहेत. पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अनुक्रमे तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट डावे, आणि द्रमुक यांचे सरकार आहे. आसाम मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. या तीन राज्यात विरोधी पक्षांची सरकारे असल्याने भाजप अस्वस्थ आहे. भाजप ही तिन्ही राज्य या निवडणुकीत काबीज करण्याची तयारी करत आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर पासूनच भाजपची तयारी सुरू आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अन्य मंत्री या राज्यांमध्ये या अगोदरपासूनच दौरे करत आहेत. पश्चिम बंगाल मध्ये विशेष सुधारणा एस. आय .आर. नंतर एक मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. यापूर्वी या राज्यात सात कोटी 66 लाख मतदार होते .आता एसआयआर मधून 63 लाख 66 हजार नावे वगळण्यात आली आहेत .जी एकूण मतदार संख्येच्या 8.3% आहेत. 2021 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 102 जागा जिंकल्या तर भाजपने 64 जागा जिंकले आहेत.

