तंत्रविद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

आळंदी: स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून तंत्रविद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवून तसेच पैशाचे अमिषाला बळी पडून दोन भोंदू बाबांना आपले घर यासाठी उपलब्ध करून दिले म्हणून चार व्यक्तींविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संत भगवानबाबा नगर, चरोली खुर्द तालुका खेड येथे घडली.

याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. याबाबत कुमार कोंडीबा गिरीगोसावी पोलीस उपनिरीक्षक आळंदी पोलीस ठाणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. एक महिला आरोपी ,सचिन मोरे, राजेंद्र वाकोडे, दगडू शिवराम गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक एक व दोन यांना आरोपी क्रमांक तीन व चार यांनी आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून तंत्र विद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवले . अमिषाला बळी पडून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आरोपी क्रमांक एक व दोन यांनी त्यांचे घर यासाठी उपलब्ध करून दिले. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य पोलीसांनी जप्त केले. यामुळे ही कारवाई करण्यात आली .आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खडके हे पुढील तपास करत आहेत.

