निष्ठवंतांसाठी पर्मनंट दुकान थाटायचं : राज ठाकरे

जिजाऊंचा जन्म दिवस हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा
पिंपरी : आपण १९ वर्षात काय केलं? आज असंख्य पक्षांना प्रश्न पडला आहे. ह्यांना फक्त मतं मिळतात, ना कोणी आमदार ना कोणी खासदार तरी ह्यांचे कार्यकर्ते एकत्र कसे राहतात. आज राजकीय फेरीवाले फिरतायेत, या फुटपाथ वरून डोळा मारला की तो दुसऱ्या फुटपाथवर जातो. आपण असले फुटपाथ बांधणार नाही तर आपल्याला निष्ठवंतांसाठी पर्मनंट दुकान थाटायचं आहे असं मत महाराष्ट्र नव निर्माणसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मनसेचा १९ वा वर्धापन दिन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, मी आज फार काही बोलणार नाही, आज शुभेच्छा देणार आहे. कारण गुढीपाडव्याला मुंबईत होणाऱ्या मेळाव्याला बोलणार आहे. आता गुढी पाडव्याला मी दांडपट्टा फिरवणार आहे, त्यामुळं मी आज कशाला चाकू अन् सुरे काढू. आज महाराष्ट्राचा चिखल झालाय, हे राजकारणी मतांसाठी एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत, आग लावत आहेत, मात्र हे जनसामान्यांच्या लक्षात का येत नाही? हा खरा प्रश्न आहे.
पक्षात आता आपल्या कामकाजाचा लेखाजोखा केला जाणार आहे. प्रत्येक पंधरा दिवसाला आढावा घेतला जाणार आहे. जर पदाधिकाऱ्याने कामचुकारपणा केल्याचं आढळलं तर मी पदावरून हकालपट्टी करणार आहे. मग त्याला ज्या फुटपाथवर जायचं आहे, त्या फुटपाथवर त्याने जावं.
काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला अनेक जण गैरहजर होते, कुठं गेले तर प्रयागराजला गेले म्हणे. कशाला तर त्या गंगेत पाप धुवायला गेले. पण अशा पाण्यात, मला म्हटलं तुम्ही पाणी घ्या, मी म्हटलं हट, असलं पाणी, अरे त्यात काय-काय होतंय. आमचे बाळा नांदगावकर आले, राज साहेब हे बघा. मी म्हटलं अरे कशी झालीये ती गंगा नदी अस्वछता हा कळीचा मुद्दा आहे. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजला पाहिजे.
पुढे ते म्हणाले, २१ जून हा सर्वात मोठा दिवस नाही. कारण महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे. हा दिवस ८ मार्चला सुरु होतो अन् पुढच्या वर्षीच्या ७ मार्चला हा दिवस संपतो. इतका हा मोठा दिवस आहे, हे ज्याचं लग्न झालंय, त्यांना चांगलं ठाऊक आहे. मुळात जिजाऊंचा जन्म दिवस हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा असं ठाकरे शेवटी बोलताना म्हणाले.