धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे : अण्णा हजारे

मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध असले पाहिजेत
अहिल्यानगर : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोपांची राळ उडवून दिली आहे. आता देशातील भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे एकेकाळचे जनक अण्णा हजारे यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अण्णा हजारे शुक्रवारी अहिल्यानगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनीच घ्यावा, असे सांगत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणापासून नामनिराळे झाले आहेत. तर धनंजय मुंडेही आपल्यावरील आरोपांचा इन्कार करत राजीनामा देण्यास तयार नाहीत.
अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविषयी विचारणा झाल्यानंतर यासंदर्भात भाष्य केले. अण्णा हजारे यांनी कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे नाव घेत नसले तरी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याने स्वतःचीच इमेज वाढते. कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार. अशा लोकांना मंत्रीमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध असले पाहिजेत. सुरवातीला हे चुकलं की नंतर अशा घटना घडतात. त्यामुळे राज्याचे, समाजाचे देशाचं नुकसान होते. याचा विचार करणं गरजेचे असल्याची प्रतिकिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
अण्णा हजारे यांनी 2011 साली देशातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या लढ्याचे नेतृत्व केले होते. लोकपाल कायद्यासाठी अण्णा हजारे अनेक दिवस दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर उपोषणाला बसले होते. त्यामुळे अण्णा हजारे हे अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. आजही नैतिकता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा हजारे यांचा शब्द प्रमाण मानला जातो. त्यामुळे आता अण्णा हजारे यांनीच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे वक्तव्य केल्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.