फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक करणार, हायकोर्टाचा इशारा!

मुंबई : महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचायं तर तुमच्याकडे डोमेसाईल असायलाच हवं. लवकरच याबाबत आदेश जारी करणार असा इशारा हायकोर्टानं दिलाय. जेणेकरून ज्याच्याकडे डोमेसाईल असेल त्यालाच फेरीवाला परवाना मिळेल, असा नियम करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले जातील असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय. अन्य राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे, मग महाराष्ट्रात असे धोरण का नाही?, असा सवालही यावेळी हायकोर्टानं उपस्थित केला.
शहर फेरीवाला कमिटीच्या निवडणुकीत मतदानासाठी 99 हजार फेरीवाल्यांना पात्र ठरवा, अशी मागणी करणारी याचिका काही फेरीवाला संघटनांनी हायकोर्टात दाखल केली आहे. फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी पालिकेने निकष ठरवले आहेत. यामध्ये डोमेसाईलही सक्तीचं करण्यात आलेलं आहे. तरीही डोमिसाईल नसलेल्या 6 हजार फेरीवाल्यांना पालिकेनं पात्र ठरवलंय. त्यामुळे अन्य फेरीवाले ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही त्यांनादेखील पालिकेने पात्र ठरवावं, अशी मागणी अॅड. गायत्री सिंह यांनी हायकोर्टाकडे केली होती.
त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली. ही मागणी मुळीच मान्य केली जाणार नाही. बाकीचे मुद्दे नंतर पण महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचाय तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवं, असं स्पष्ट करत यासंदर्भातील सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.