फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
कला साहित्य

साहित्य हाच साहित्यिकांचा धर्म

साहित्य हाच साहित्यिकांचा धर्म

इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी (कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी) : संतत्व हेच साहित्याचे ध्येय होय! कारण, साहित्यिकांना कोणताही जातधर्म नसतो. साहित्य हाच त्यांचा धर्म असतो!, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोशीतील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीत व्यक्त केले.

मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. देहू आळंदी रस्त्यावरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीत हा सोहळा झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे होते.
व्यासपीठावर खेडचे आमदार बाबाजी काळे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, स्वागताध्यक्ष म्हणून वंदना आल्हाट, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे कार्यवाह सुनीताराजे पवार, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सदस्य ॲड. माधवी निगडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘अक्षर इंद्रायणी’ या स्मरणिकेचे आणि ‘काल भवताल’ या कथासंग्रहाचे श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन केले.

निमंत्रक अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून, ‘ज्ञानोबा-तुकोबांच्या भूमीत आपली संस्कृती अबाधित राहावी आणि मराठी भाषेचे जतन, रक्षण अन् संवर्धन व्हावे, या उद्देशातून परिषदेची स्थापना आणि तीन साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे!’ अशी भूमिका मांडली. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. संगीता देवकर-थोरात यांनी आभार मानले.

साहित्याचा धर्म हा सत्याचा
विविध विचारांचे लोक एकत्र येऊन त्यांनी साहित्य संमेलन भरवले यांचे कौतुक डॉ. सबनीस यांनी केले. राजकीय जोडे बाहेर ठेवून सर्व राजकीय पक्षांचे नेते या साहित्यिक व्यासपीठावर एक झाले आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असे सांगून सबनीस म्हणाले, ‘ज्ञानोबा-तुकोबांच्या या भूमीला मी वंदन करतो. संतांचे अधिष्ठान नसले, तर ती संस्कृती वांझ ठरते. यशवंतरावांच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. साहित्याचा धर्म हा सत्याचा असतो. साहित्याची सेवा करणे हे सत्यवादी लोकांचे काम आहे.

तुकोबांची पगडी देऊन सबनीस यांचा गौरव
डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या हस्ते डॉ. सबनीस यांना पहिला ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ प्रदान केला. तुकोबांची पगडी, सन्मानचिन्ह, अकरा हजार रुपये, उपरणे आणि पुष्प, असे पुरस्काराचे स्वरूप होते. दादाभाऊ गावडे लिखित ‘ताल भवताल’ या कथासंग्रहाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आणि पांडुरंग गाडीलकर यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले; तसेच बाबाजी काळे यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा’ या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"