लडाखच्या काही भागांवर चीनचा दावा; भारताने फटकारले

भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल
नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून सुरू असलेला वाद सुटत असतानाच चिनी ड्रॅगनने पुन्हा आपली नखे बाहेर काढली आहेत. लडाखच्या काही भागावर चीनने आपला हक्क सांगितला आहे. यावर भारताने कठोर भूमिका घेतली असून भारताच्या भूभागावर अवैध कब्जा मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लडाखच्या काही भागावर दावा सांगणाऱ्या चीनचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की चीन आपल्या होटन प्रांतात दोन नवीन काउंटी (राज्य) निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या परगण्यांचा काही भाग लडाखमध्ये येतो.
गेल्या महिन्यात, चीनने होटन प्रांतात हेआन आणि हेकांग या दोन नवीन काऊंटीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. या प्रांतातील काही भाग लडाख या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहेत. हा भाग भारताचा अविभाज्य भाग असून चीनचा दावा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
चीनने आपल्या होटन प्रांतात दोन काऊंटीची घोषणा केली आहे. ही काऊंटी असलेला भाग भारताच्या केंद्रशासित लडाखमध्ये येतो. याप्रकरणी भारताने चीनकडे जोरदार विरोध दर्शवला आहे. भारत लडाखमधील भारताच्या मालकीच्या जागेवर चीनचा अवैध कब्जा कधीही स्वीकारणार नाही. नवीन काऊंटी निर्माण केल्याने चीनच्या अवैध व जबरदस्तीने बळकावलेल्या जागेला वैधता मिळणार नाही. आम्ही राजनैतिक मार्गाने चीनकडे याबाबत तीव्र विरोध दर्शवला आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.
भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, लडाखवर चीनचा बेकायदेशीर कब्जा भारत कधीच मान्य करणार नाही. चीनने नवीन काऊंटी जाहीर केल्याने भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, या भागावर चीनचा बेकायदेशीर आणि बळजबरी कब्जा आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही राजनैतिक माध्यमातून याबाबत चीनकडे तक्रार केली आहे.