मंत्रिपद, मंत्रालयातील दालन , सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण 18 मंत्र्यांनी नाही स्वीकारला पदभार!

मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही तब्बल 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे हे मंत्री नव्या वर्षामध्येच पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षातील राहिलेल्या दोन दिवसांमध्ये पदभार स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, तत्पूर्वी सुद्धा या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नव्हता हे विशेष. पदभार न स्वीकारलेले दत्ता भरणे सहकुटुंब परदेशात गेले आहेत.
कोणत्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही?
आशिष शेलार ,अतुल सावे ,नरहरी झिरवाळ ,भरत गोगावले ,गुलाबराव पाटील , दादा भूसे , जयकुमार रावल ,माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील ,योगेश कदम , पंकज भोयर ,बाबासाहेब पाटील ,दत्तात्रय भरणे , प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ ,आशिष जयस्वाल ,मेघना बोर्डीकर
पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षांत वाद सुरू?
दुसरीकडे, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत गोंधळ सुरूच आहे. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाबाबत बराच काळ सस्पेंस होता. यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले. या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी 16 दिवस लागले. या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली. आता ते प्रकरण शांत झाले असून, पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षांत वाद सुरू झाल्याचे वृत्त आहे.