फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

बोट आपघातातील मृतांची संख्या १४ वर

बोट आपघातातील मृतांची संख्या १४ वर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ (Gateway Of India Boat Accident) येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या आता १४ झाली आहे. गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.

बुधवारी दुपारी एलिफंटा केव्ह्जच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीडबोटची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. आता त्यात एक मृत्यू आणखी झाल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान बोटीखालून हात बाहेर आल्याचे समजताच पथकाने त्या भागात शोध सुरु केला. त्यानंतर बचाव पथकाने बोटीखाली अडकलेला मृतदेह काढण्यास सुरुवात केली. बोटीचा काही भाग कापून मृतदेह बाहेर काढून जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेह हंसाराम भाटी यांचा असल्याचं स्पष्ट होताच भाटी कुटुंबियांनी टाहो फोडला. मालाडचे रहिवासी असलेले हंसाराम भाटी हे ४३ वर्षांचे होते. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. आपली पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा यांच्याबरोबर ते तानाजी नगर परिसरात राहात होते.

दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधील नातेवाईक प्रवीण राठोड आणि नीता हे त्यांच्याकडे राहण्यासाठी आले होते. तेव्हा नातेवाईकांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया आणि एलिफंटाला जाण्याचा भाटी यांनी प्लॅन केला. मात्र, बोट दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात राठोड दाम्पत्य आणि भाटी यांची पत्नी तसेच मुलगा तरुण वाचला आहे.

बोट अपघातातील मृतांची नावे :

  1. महेंद्रसिंग शेखावत (नौदल)
  2. प्रवीण शर्मा
  3. मंगेल (नौदल बोट कर्मचारी)
  4. मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी जहाज)
  5. राकेश नानजी अहिरे (प्रवासी जहाज)
  6. साफियाना पठाण
  7. माही पावरा (3 वर्ष)
  8. अक्षता राकेश अहिरे
  9. मिथु राकेश अहिरे (8 वर्ष)
  10. दीपक व्ही.
  11. हंसाराम भाटी

(दोन महिला यांची अद्याप ओळख पटलेली नाही.)

धुळ्यातील बालिका मरण पावली
या दुर्घटनेत धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथील माही पावरा या बालिकेचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पळासनेर येथील साईराम भिला पावरा (वय ३२ वर्ष) हा पत्नी रंजना पावरा (वय २८ वर्षे) आणि ३ वर्षांची बालिका माही पावरा आणि पुतण्या शालिराम पावरा (वय १८ वर्षे) असे चौघे जण मुंबई येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला कुटुंबासह गेले होते. त्यानंतर ते १८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेणी पाहण्यासाठी नीलकमल प्रवासी बोटीत इतर पर्यटकांसोबत निघाले होते. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्यामुळे बोटीतील १३ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर शंभराहून अधिकांना वाचविण्यात यश आले.

या बोटीत असलेल्या पळासनेरच्या पावरा परिवारातील ३ वर्षाची बालिका माही हिचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर साईराम पावरा, पत्नी व पुतण्या हे तिघे यातून सुखरुप वाचलेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत साईराम पावरा यांची माही पावरा (३) हिचा समुद्रातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. बालिकेचा मृतदेह १९ रोजी सायंकाळी पळासनेर गावात पोहचला. रात्री शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिकच्या कुटुंबाचा आनंद क्षणभंगुर
दुसरीकडे, मुंबईनगरीत बोटीने फेरफटका मारावा, अशी इच्छा नाशिकहून मुंबईला आलेल्या सात वर्षांच्या निधेशने आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यांनी मोठ्या हौसेने मुलाला ही सैर घडवण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया गाठली. ‘नीलकमळ’मध्ये ते बसले. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. अथांग समुद्र डोळ्यांत साठवून घेत असतानाच काळाचा घाला या कुटुंबावर पडला. बोटीच्या धडकेत झालेल्या अपघातात निधेशसह त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"