जरांगे यांचे २५ जानेवारीपासून उपोषण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २५ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करत आहेत. जरांगे यांनी आज ही घोषणा केली. राज्यभरातील मराठा समाजातील लोकांनी आंतरवाली सराटीमध्ये जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा सुरू करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी आधीच सांगितले होते. त्यानुसार २५ जानेवारीपासून हे आमरण उपोषण सुरू होणार आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मराठा समाजाला आंतरवाली सराटीमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यासाठी सरकारला वाकवल्याशिवाय हटणार नाही, असा जरांगे यांचा इशारा आहे. उपोषणाला बसून आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.