फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
अध्यात्म

जैन धर्मात सर्वांना सामावून घेण्याची ताकद

जैन धर्मात सर्वांना सामावून घेण्याची ताकद

पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवात श्री १०८ अमोघकीर्तिजी यांचे प्रतिपादन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : जैन धर्म हा कोणत्याही संस्कृती किंवा जातीच्या विरोधात नाही. उलट सर्वांना सामावून घेण्याची ताकद जैन धर्मामध्ये आहे. राष्ट्रविकास, राष्ट्रसेवा ही भावना समोर ठेवून नेहमीच अन्य समाजासाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे, असे प्रतिपादन श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज यांनी आज केले.

भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर व श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवात दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. गुरुवारी (ता. १२) पारंपरिक पद्धतीने पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रम झाले. हा महोत्सव १५ तारखेपर्यंत चालणार आहे. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २७-अ नियोजित महापौर निवास मैदान येथे दीवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे व्यासपीठावर हा महोत्सव होत आहे.

श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज म्हणाले, जगात जैन धर्म हा सर्व धर्मांना समान स्थान देतो. हिंदू, पारशी, शीख, मुसलमान, ख्रिश्चन या धर्मांमध्ये जैन समाज सामावलेला आहे. जैन धर्माला कोणीही संस्थापक नाही. तर २४ तीर्थंकर आहेत, महावीर आदिनाथ हे पहिले आणि २४ वे तीर्थंकर भगवान महावीर आहेत. हे सगळे धर्माचे संचालक होते. जैन धर्मातील सर्व मुनी, आचार्य यांनी हा धर्म जगात वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्याला जगात विश्वव्यापी रूप देण्याचा प्रयत्न केला. जैन धर्म हा सर्वगुणसंपन्न आहे. कोणत्याही संस्कृती, जाती यांच्या विरोधात नाही. सर्वांना समावून घेण्याची ताकद त्यात आहे. सर्वधर्म संस्कृतीप्रमाणे जैन बांधव अभिषेक, पूजा, दान, तपश्चर्या, उपासना, परोपकार, आराधना याद्वारे मनःशांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. करूणा, दया, साधना, तत्त्व, आचरण करणारा समाज आहे. विश्वशांतीचा अविष्कार करणारा हा समाज आहे. सध्याच्या डिजिटल युगातील माध्यमांचा वापर धर्माचा प्रचार करण्यासाठी अवश्य करावा. जेणेकरून, धार्मिक गोष्टींची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचविता येईल.

श्री १०८ अमरकीर्तिजी महाराज म्हणाले की, दिगंबर तीर्थंकर हे जन्मापासूनच सर्व गुणसंपन्न असतात. समाजाच्या विकासासाठी झटत असतात. ते नेहमीच नखशिखांत पवित्र असतात. ध्यान, तपश्चर्या मनापासून करतात. जिओ और जिने दो.. या तत्त्वानुसार आचरण करतात, हीच जैन समाजाची संस्कृती आहे.

आचार्य विद्यानंदजी महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्यानिमित्त डॉ. रावसाहेब पाटील यांच्या पंचरंगी प्रबोधिनी पुस्तिकेचे प्रकाशन महोत्सवात झाले. ते म्हणाले की, आचार्य विद्यानंदजी यांनी जैन समाज एकसंध ठेवण्यासाठी आपले आयुष्य वेचले. समाजाची विविध स्थानके सुरू केली आणि उपक्रमांची योजना आखली, ज्यानिमित्ताने समाज एकत्र येऊ शकेल. त्यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला.

दक्षिण जैन सभेचे पदाधिकारी चकूरजी गांधी, मिलिंड फड, डी ए पाटील, सुरेंद्रजी गांधी, वीरेंद्र जैन यांचीही भाषणे झाली. नांदणी मठाचे भीमसेन भट्टारक महाराज यांनीही आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या हस्ते मुखदर्शन पत्रिकेचे प्रकाशन झाले. दिवंगत वसंतदादा पाटील यांनी आणि आता त्यांच्या कुटुंबियांनी नेहमीच आमच्या समाजाला विविध प्रकारचे सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याप्रति आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील यांनी व्यक्त केली.

महोत्सवात सकाळपासून झालेले कार्यक्रम
महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यविधी, लघुशांती, भगवानांना पंचामृताचा अभिषेक महाशांतीपाठी आदी कार्यक्रम झाले. भगवंत जन्मकल्याणक महोत्सव साजरा झाला तसेच जन्मकल्याणकावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. जन्म कल्याण तिथी पूजन करण्यात आले. संध्याकाळी बालकांच्या हस्ते १००८ कलश जन्माभिषेक करण्यात आला आणि मिरवणूक काढण्यात आली. नामकरण विधी, बालक्रीडा, संगीत आरती, विश्वशांती जाप्य अनुष्ठान आदी कार्यक्रमांमध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

कार्यक्रमाचे नियोजन अजित पाटील, शांतिनाथ पाटील, धनंजय चिंचवडे, प्रकाश शेडबाळे, सुरगोंडा पाटील, संजय नाईक, वीरेंद्र जैन, सुदिन खोत, उमेश पाटील, विनोद वठारे, विजय भिलवडे, शरद आलासे व पार्श्व पद्मावती महिला मंडळ, वीर सेवा दल आणि जैन महिला मंडळ यांनी केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"