विधानसभेसाठी गृह मतदानाला प्रारंभ

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. राज्यात विविध जिल्ह्यात गृह मतदानाला प्रारंभ झाला आहे.
पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांकडून नमुना १२ – डी भरून घेण्यात आला आहे. गृहमतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदानाची व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी / कर्मचारी, मायक्रो निरीक्षक, व्हिडीओग्राफर, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी सोबत राहणार आहे. गृहमतदानाची पूर्वसूचना बीएलओमार्फत संबंधित नोंदणीकृत मतदारांना देण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची आत्यंतिक काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात विविध ठिकाणी आठ तारखेपासून गृह मतदानाला प्रारंभ झालेला आहे. बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.
नागरिकांना आवाहन
भारतीय निवडणूक आयोगाने दिव्यांग नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे. आठ नोव्हेंबर पासून थेट मतदान प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे.त्यासाठी बिएलओ आपल्यापर्यंत पोहोचतील.त्यांना प्रतिसाद द्यावा व या प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.