बचावाखातर थेट डोक्यात गोळी झाडता का?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनीही या घटनेवरून सरकारला धारेवर धरले आहे. अशातच न्यायालयानेही बुधवारी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मरण पावलेला अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. अक्षय याला डोक्याला गोळी लागली. या प्रकरणी सरकारी वकिलांना कोर्टाने काही प्रश्न विचारले आहेत. सर्वसाधारणपणे आरोपीने जर पोलिसांवर बंदूक रोखली तर थेट त्याच्या डोक्यालाच गोळी मारली जाते का, पोलिस अशा परिस्थितीत नेमके काय करतात, असा प्रश्न न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
त्यावर सरकारी वकील म्हणाले की, व्हॅनमध्ये अक्षयने पिस्तुल हिसकावली तेव्हा त्याच्याबरोबर झटापट झाली. व्हॅनमधील पोलिस चालकाच्या दिशेने पळाले तेव्हा पोलिस अधिकारी निलेश माने यांच्याकडून आलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेत ती गोळी अक्षयच्या डोक्याला लागली.
अक्षय शिंदेसारखी एक सामान्य व्यक्ती ३ गोळ्या फायर करेपर्यंत पोलिस काय करत होते. व्हॅनमध्ये प्रशिक्षित पोलिस असूनही एका सामान्य व्यक्तीला ते का रोखू शकले नाहीत, असा सवालही कोर्टाने विचारला आहे.