आता वेळ वाढवून मिळणार नाही!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
जालना : वर्षभरापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला अजूनही राज्य सरकारकडून समाधानकारक निर्णयावर एकमत होत नसल्यामुळे आता, कोणतीही तारीख मिळणार नाही, असा इशारा देत मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जरांगे यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा उपोषणास्त्र बाहेर काढले आहे.
या विषयासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या विरोधात सरकारने किती वेगवेगळ्या पद्धतीने फासे टाकले तरी मी तुमचे गणित बिघडवणारच. त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या. आरक्षण दिले नाही तर निवडणुकीत जे होईल, त्याबद्दल माझ्या नावाने ओरडू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी माझा जीवघेणा प्रवास सुरू आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही त्यामुळे त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसामध्ये अंमलबजावणी करावी आणि आम्हाला आरक्षण द्यावं. सरकारला आता वेळ वाढवू देणार नाही.
ओबीसी बांधवांचेही उपोषण
मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी गावा शेजारी सोनियानगर येथे ओबीसी बांधवांकडून ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयरे यांची अंमलबजावणी, हैद्राबाद गॅझेट यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने असे निर्णय घेऊ नये. आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.