महिलांवरील अत्याचार अक्षम्य पाप : पंतप्रधान

जळगाव : महिलांची सुरक्षा हि देशाची प्राथमिकता आहे. महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप असुन हे पाप करणारा कुठलाही दोषी वाचला नाही पाहिजे. शाळा, ऑफिस, पोलीस ठाणे कोणताहि स्तर असो निष्काळजीपणा खपवुन घेणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या लखपती दीदी संमेलनात दिला.
जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित लखपती दीदी समेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री पेम्मास्वामी, प्रतापराव जाधव, कमलेश पासवान, रक्षा खडसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
अत्याचारासारखे क्रूर कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होण्यासाठी महायुती सरकार कायदा कडक करत आहे. सरकार येईल जाईल पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. सरकार येईल जाईल, पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सर्व राज्य सरकारे आणि राजकीय पक्षांना सांगतो, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहे. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
त्याचबरोबर, तक्रारीच्या वेळेत एफआयआर होत नाही, सुनावणी होत नाही, खटला उशिरा सुरू होतो, निर्णय उशिरा येतो. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केल्या आहेत. काही पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी घाबरतात. त्यामुळे आता ई-एफआयआर सुविधाही सुरु केली आहे. तसेच ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. नव्या फौजदारी कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल, असेही मोदी यांनी सांगितले.