बदलापुरात आंदोलनानंतर तणाव वाढला

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : सात दिवसांनी उघडकीस आलेल्या दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बलदापूरमध्ये नागरिक आक्रमक झाले आहेत. बदलापूरमध्ये नागरिकांचे आंदोलन चिघळत असल्याचे चित्र आहे. रस्ते, दुकानं बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी गेल्या चार तासांपासून रेल्वे रोखून धरल्या आहेत. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी आक्रमक पवित्रा उचलावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अत्याचार करणाऱ्याला फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करीत, नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. संबंधित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाले आहेत. नागरिक बदलापूर स्थानकात गोळा झाल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. तर, दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली.
काय आहे नेमकी घटना?
अवघ्या तीन वर्षे ८ महिने वय असलेल्या मुलीला लघवीच्या जागी मुंग्या चावल्यासारखा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन संबंधित मुलीची आई डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचार झाल्याच्या दिवसाला आता तब्बल सात दिवस उलटून गेले आहेत. बदलापूर इथल्या आदर्श विद्यालयात ही मुलगी शिकते. या मुलीसह आणखीही काही मुलींवर असाच अत्याचार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. शाळेतील कर्मचारी असलेल्या व्यक्तीनं हा घृणास्पद प्रकार केला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर शाळेबाहेर पालकांनी मोठ्या संख्येने आंदोलनाला सुरुवात केली. याचे पडसाद नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही झाले. बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी रेल रोको केल्यामुळं लोकल, मेल, एक्स्प्रेसवर परिणाम झाला आहे. अत्याचार करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे, ही मागणी बदलापूरवासियांनी लावून धरली आहे.
काय म्हणाले मुख्यंमत्री?
यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी घेतले जाईल.