लाडकी बहीण योजना; दुहेरी लाभामुळे 500 रुपयेच मिळणार!

आठ लाख लाभार्थी महिलांवर याचा परिणाम होणार
मुंबई : महायुती सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना राबवून मतदारांना लालूच दाखवण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला पंधराशे ऐवजी 2100 रुपये देण्याचे वचन दिले होते, मात्र या वचनामुळे राज्याच्या तिजोरीवर जास्त प्रमाणात बोजा पडला. यासाठी या योजनेतून जास्तीत जास्त महिलांना कसे कमी करता येईल याचा विचार महायुती सरकारने केल्या तीन महिन्यापासून केला आहे .आता ज्या महिलांना दुहेरी लाभ मिळत आहे, अशा बहिणींना यातून कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून देखील सहा हजार रुपये अशा एकूण 12 हजार रुपयांचा वार्षिक लाभ काही महिलांना मिळतो. या महिलांचा दुहेरी लाभ टाळण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेची कपात करून ती फक्त पाचशे रुपये करण्यात आली आहे .हा निर्णय एप्रिल महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला . राज्य सरकारच्या नियमानुसार एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो ,परंतु काही महिलांनी मागील काही काळात एकाच वेळी शेतकरी सन्माननिधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे.

सरकारने याची छाननी केली असून ज्या महिला दोन्ही योजना घेतात ,त्यांना लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये मिळतील असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतून आठ लाख लाभार्थी महिलांवर याचा परिणाम होणार आहे .यापूर्वी अनेक महिलाच्या अर्जांची छाननी करून नियमात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे .जास्तीत जास्त महिला लाभार्थींना कमी करण्याचा सपाटा महायुती सरकारने सुरू केला आहे .एका बाजूला माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही योजना आम्ही बंद करणार नाही असे छातीठोकपणे सांगत आहेत. त्यातच महिला लाभार्थींना कसे कमी करता येईल हेच धोरण सध्या महायुती सरकार राबवत असल्याचे दिसून येते. आर्थिक लाभाचा दुहेरी फायदा मिळू नये यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, यापुढे संबंधित महिलांना केवळ एकाच योजनेचा मुख्य लाभ घेता येणार आहे.