फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
अध्यात्म

मौनी अमावस्येला १९५४ मध्ये हेच घडलं होतं..

मौनी अमावस्येला १९५४ मध्ये हेच घडलं होतं..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : कुंभमेळ्याच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची यंदा पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही असा प्रकार झाला आहे. चेंगराचेंगरी होऊन श्रद्धाळू भाविकांचा मृत्यू होणं हा कुंभमेळ्याचा एक कटू इतिहासच म्हणावा लागेल.

तीन फेब्रुवारी १९५४. प्रयागराज (तत्कालीन अलाहाबाद) येथे मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानासाठी लाखो श्रद्धाळू दाखल झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भरलेला हा पहिला कुंभमेळा होता. तेव्हा चेंगराचेंगरीला एक घटना कारणीभूत ठरली होती, असे सांगितले जाते. एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. जीव वाचविण्यासाठी भाविक सैरावैरा पळू लागले. भाविकांचे किंचाळणे, आक्रोश यामध्ये परिसरात गोंधळ वाढतच गेला आणि एकमेकांना तुडवत लोक जीव वाचवत धावू लागले आणि चेंगराचेंगरीत तब्बल ८०० लोकांचे प्राण केले.

या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यानंतर पुढे कुंभ मेळ्यात हत्तींच्या प्रवेशावर कायमचे निर्बंध लादले गेले. सरकारने देखील नियोजनात बदल केले. कुंभमेळ्यातील प्रत्येक क्षणाची माहिती देणारे ध्वनिक्षेपक लावण्यास प्रारंभ झाला. पुरेसे दिवे लागतील, याकडे लक्ष दिले गेले. १९५४ च्या दुर्घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी व्हीआयपींमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी या भागातील व्हिआयपी दौऱ्यांवरच बंदी घातली.

कुंभमेळ्यावर कायमच दुःखाचे सावट
१९८६ – हरिद्वार कुंभमेळा – २०० भाविकांचा मृत्यू
हरिद्वार येथे १९८६ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात २०० भाविकांनी प्राण गमावले. उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह तसेच अन्य अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार हरिद्वार येथे पोहोचले. त्यावेळी व्हीआयपींमुळे सामान्य भाविकांना सुरक्षारक्षकांनी रोखले. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि झालेल्या चेंगराचेंगरीत २०० भाविकांनी आपला जीव गमावला.

२००३ – नाशिक – ३९ जणांचा मृत्यू; १०० जखमी
महाराष्ट्रात नाशिक येथे २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात पवित्र स्नानाच्या वेळी गोदावरी नदी पात्रात हजारो लोक उतरले होते. या चेंगराचेंगरीत ३९ जण मरण पावले आणि १०० जण जखमी झाले होते.

२०१३ – उत्तरप्रदेशात प्रयागराज येथे २०१३ मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी अलाहाबाद येथील रेल्वे स्थानकावर पादचारी पूल कोसळला. कुंभमेळ्यासाठी आलेल्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यात ४२ जणांचा मृत्यू झाला तर ४५ लोक जखमी झाले.

यंदा २०२५ मध्ये अमावस्येला पहाटे १ च्या दरम्यान महाकुंभ मेळ्यात नेमकं घडलं काय?
२०२५ – प्रयागराज – १४ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

यंदाही मौनी अमावस्येच्या वेळी पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन भाविकांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या दरम्यान त्रिवेणी संगम घाटावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अजूनही या चेंगराचेंगरीमध्ये किती भाविकांचा मृत्यू झाला, याचा अधिकृत आकडा देण्यात आलेला नाही. या चेंगराचेंगरीत शेकडो भाविक गंभीर झाल्याचे सांगितले जाते. तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"