हाथरस दुर्घटना: मृतांचा आकडा १२१

हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगनंतर मंगळवारी (२ जुलै) चेंगराचेंगरी झाली आणि दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलांचा समावेश आहे. दरम्यान, एटा मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांचा खच पाहून कर्तव्यावर असलेल्या शिपायाला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेतील जखमी आणि मृतांना बस आणि टेम्पोमध्ये भरुन सिंकदराऊ सीएचसी आणि एटा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.
हाथरस येथील दुर्दैवी घटनेनंतर क्युआरटीच्या ड्युटीवर तैनात असलेले शिपाई रवी यादव (रा. अलीगड) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. मृतदेहांची व्यवस्था पाहण्यासाठी रवी यादव यांची ड्युटी लावण्यात आली होती. याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक जगदीश चंद्र मौर्य यांनी सांगितलं की, शिपाई रवी यादव यांची ड्युटी हाथरस दुर्घटनेत मृतदेहांची व्यवस्था करण्यासाठी लावण्यात आली होती. ड्युटी दरम्यानच त्यांना हृयविकाराचा झटका आला.
एटाचे एसपी राजेश कुमार सिंह म्हणाले की, हाथरस जिल्ह्याच्या मुगलगढी या गावात एक धार्मिक कार्यक्रम सुरु होता. तेव्हा अचानक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह एटा रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचेही मृतदेह होते. या सर्व मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. या घटनेमागील कारणांच्या तपासासाठी एडीजी आग्रा आणि अलीगडच्या आयुक्तांचं पथक तयार करण्यात आलं आहे.
काय घडलं हाथरसमध्ये?
हाथरसमध्ये भोले बाबा नावाच्या व्यक्तीचा सत्संग सुरु होता. त्यांचा सत्संग ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. सत्संगाच्या स्थळाहून जेव्हा या बाबांची गाडी बाहेर पडली तेव्हा त्यांच्या पायाखालची माती घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली, यातच चेंगराचेंगरी झाली. काही लोक खाली पडले, त्यांच्यावर पाय ठेवून इतर लोक गेले. या घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, या घटनेनंतर भोले बाबा मात्र फरार झाले आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.