बोऱ्हाडेवाडी नगररचना योजनेतून रहिवासी क्षेत्र वगळले

फक्त मुद्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील वाढीव हद्दीतील मौजे बोऱ्हाडेवाडी येथे नगररचना योजनेतून (टीपी स्कीम) रहिवासी क्षेत्र वगळण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत मान्यता दिली आहे. रहिवासी क्षेत्र वगळल्यामुळे आता ‘हरित’ भागात योजना राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार महापालिका प्रशासनाने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगररचना योजना राबविण्याचे ठरविले होते. त्यानंतर महापालिका सभेने मान्यता दिली. मात्र, बोऱ्हाडेवाडी येथील स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र यांनी निवासी, रहिवाशी क्षेत्र या योजनेतून वगळवावे, या करिता योजनेला विरोध केला होता. महापालिका प्रशासनाने याबाबत बैठकही घेतली होती. त्यात बोऱ्हाडेवाडीत रहिवासी क्षेत्र अधिक आहे, काही लोकांना घर बांधण्याएवढीही जागा शिल्लक राहणार नाही, त्यामुळे योजनेतून या भागास वगळावे, अशी मागणी केली होती. याबाबत आयुक्त शेखर सिंह आणि नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, रहिवाशी क्षेत्र वगळण्याबाबत आयुक्तांनी शिष्टमंडळास आश्वासन आश्वासन दिले होते. त्यानुसार, कार्यवाही झाली आणि या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे.
नगररचना योजनेमध्ये बोऱ्हाडेवाडीतील गट क्र. ६६ , ६७ , ६९, ७०, ८३, ८६, ३१, ३०, ३२ बाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये शेती विभागातून रहिवास विभागात फेरबदल झाला आहे. शुद्धीपत्रक करुन हा भाग योजनेतून वगळले आहे. त्यामुळे आता ही रहिवाशी क्षेत्र वगळून राबविली जाणार आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, बोऱ्हाडेवाडी गावातील नगररचना योजनेतील रहिवासी क्षेत्र वगळावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. एखादा प्रकल्प राबविताना ८० टक्के लोकांची संमती घेणे आवश्यक असते. रहिवासी क्षेत्र वगळण्याबाबत काही शेतकऱ्यांनी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार हरित क्षेत्र अधिक असलेल्या भागात, रहिवासी क्षेत्र वगळून योजना राबवण्यात येणार आहे.