चिंचवड रेल्वेस्थानकावरअवतरले गांधीजी !

पिंपरी : मुंबईहून येणाऱ्या रेल्वेतून एका ब्रिटिश अधिकाऱ्यासमवेत चिंचवड रेल्वे स्थानकावर आज चक्क महात्मा गांधीजी उतरले आणि त्यांच्या नावाच्या जयघोषाने स्टेशन दुमदुमून गेले. ९ ऑगस्ट १९४२ या दिवशीही या स्थानकावर महात्मा गांधी काही काळ थांबले होते, या आठवणीला शब्दधन काव्यमंचाच्या वतीने अभिरूप उजाळा देण्यात आला.
महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ आंदोलन पुकारल्यामुळे त्यांना अटक झाली होती. दिनांक ९ ऑगस्ट १९४२ ला पुण्यातील येरवडा कारागृहात आणले जात होते. परंतु जनक्षोभ उसळू नये, म्हणून पिंपरी चिंचवडमधील चिंचवड रेल्वेस्थानकावर त्यांना उतरवून घेतले होते. या घटनेची आठवण शब्दधन काव्यमंचाने या प्रसंगाचे अभिरूपदर्शन घडवून आणले.
रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी विचारजागर या ऐतिहासिक कविसंमेलन घेण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल महात्मा गांधींच्या आणि सुभाष चव्हाण इंग्रज अधिकार्याच्या वेशभूषेत सहभागी झाले होते; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंयोजक प्रकाश क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्ष मुकेश चुडासामा, चिंचवड रेल्वेस्थानक प्रबंधक मॅथ्यू जॉर्ज, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, अशोकमहाराज गोरे, राजेंद्र घावटे, कैलास भैरट, प्रकाश घोरपडे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालकवयित्री सानिका जोशीपासून ते ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्यापर्यंत सुमारे तीस कवींनी आपल्या देशभक्तिपर रचनांनी वीरश्रीपूर्ण वातावरणनिर्मिती केली होती. यामध्ये शोभा जोशी, अरुण कांबळे, सीमा गांधी, बाळकृष्ण अमृतकर, शामला पंडित, आय. के. शेख, अण्णा जोगदंड, अण्णा गुरव, योगिता कोठेकर, शामराव सरकाळे, आत्माराम हारे, रशिद अत्तार, जयवंत पवार यांच्या रचना उल्लेखनीय होत्या. कविवर्य रघुनाथ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तिपर घोषणा दिल्या. नामदेव हुले, आनंद मुळूक, राजू जाधव, फुलवती जगताप, शरद काणेकर, राजेंद्र पगारे, सुंदर मिसळे, काळुराम सांडगे यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. वंदेमातरमने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.