अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : खासगी सुविधा केंद्रामुळे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची पद्धत पूर्ववत ठेवावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या बांधकाम कामगार समितीची पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कामगारांची बैठक चिंचवड-संभाजीनगर येथे झाली. त्या वेळी नखाते बोलत होते. बैठकीला संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, तुषार घाटुळे, श्यामसुंदर खेडकर, दीपचंद वानखेडे, सुनील जाधव, ओमप्रकाश मोरया, रवींद्र जाधव, स्वाती घाडगे, नंदा बहिर, वैशाली भदाणे, अनिता जाधव, रुपा पोरे, निलोफर शेख, छाया पाटील, श्रीदेवी वाहुळे, शरीन सय्यद, मधू यादव, महादेव गायकवाड उपस्थित होते.
नखाते म्हणाले, राज्यातील बांधकाम कामगारांना साधी आणि सोपी शक्य होईल अशा ठिकाणी अर्ज नोंदणी करणे, नूतनीकरण करणे या सुविधा यापूर्वी ऑनलाइन पोर्टलद्वारे खुल्या होत्या. मात्र, ही पद्धत बंद करून राज्यातील साडेतीनशेहून अधिक ठिकाणी खासगी कंपन्यांकडे काम सोपविले आहे. त्यामुळे खासगी ठेकेदार पोसण्यासाठी पद्धत बंद केल्याची भावना बांधकाम कामगारांमध्ये आहे.
खासगी ठेकेदारांकडे काम दिल्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होण्याऐवजी किचकट झाली आहे. कामगारांना काम बुडवून तासन् तास ताटकळत रहावे लागत आहे. त्यामुळे कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. शासनाकडून केवळ जाहिरातबाजी करून योजनांचा लाभ मिळत असल्याचे भासवले जात आहे. प्रत्यक्षात, योजनांचा लाभ मिळतो का? अशी शंका नखाते यांनी उपस्थित केली आहे.
कामगारांना अनेक सेवा सुविधा अपेक्षित आहेत. त्यापैकी प्रमुख मागण्यांचा विचार व्हावा. अन्यथा, राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा नखाते यांनी दिला आहे. काम करतेवेळी सुरक्षेची साधने, मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, पाल्यांसाठी विवाह अनुदान, महिलांसाठी प्रसुती अनुदान, घरांसाठी गृहप्रकल्प अनुदान, गंभीर आजारांवर उपचार मदत मिळावी, अशी कामगारांची मागणी आहे.