संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी येथे आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्याची रविवारी (एक डिसेंबर) सांगता झाली. २३ नोव्हेंबरपासूनच्या या कालावधीत ठिकठिकाणी परंपरेप्रमाणे, उत्स्फूर्ततेने धार्मिक कार्यक्रम झाले.
आळंदी कार्तिकी यात्रेचा सोहळा याची देहा, याची डोळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते. २३ नोव्हेंबरला पालखी सोहळ्याचे मालक हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर दररोज पवमान अभिषेक, महापूजा, महानैवेद्य, घंटानाद, किर्तन, प्रवचन, जागर हे कार्यक्रम परंपरेप्रमाणे झाले. संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज निर्मित पुरातन वैभवी रथामध्ये निघालेली मिरवणूक यंदाचे मुख्य वैशिष्ट्ये ठरले. दीर्घ वर्षांनंतर भाविकांना जुन्या रथातील श्रींचे अनोखे दर्शन झाले.
कार्तिकी वद्य अमावस्येच्या दिवशी (एक डिंसेबर) श्रींचा छबिना आणि शेजारती होऊन सोहळ्याचा समारोप झाला. तत्पूर्वी संत ज्ञानदादा आणि संत आदिशक्ती मुक्ताबाई बहिण-भावंडांच्या भेटीचा सोहळा झाला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यासाठी पंचक्रोशीतील विविध धार्मिक संस्था आणि संघनटनांनी सहकार्य केले.
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील पर्यावरण प्रकृती विभाग यांच्यावतीने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत नदी घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी भाग घेतला. आळंदी धाम सेवा समितीच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मावाटप उपक्रम राबविण्यात आला.