पुत्र व्हावा ऐसा..

- शांतिब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, (मा. अध्यक्ष), सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी असे शांतीब्रह्म व्यक्तीमत्त्व आणि आळंदी येथील सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे परमपूज्य गुरुवर्य मारोती महाराज कुऱ्हेकर म्हणजे वारकरी संप्रदायातील वंदनीय बाबा होत. ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग कंठस्थ करुन बुद्धी कौशल्याची ओळख बाबांनी वारकरी संप्रदायात निर्माण केली आहे. वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक वै. प्राचार्य गुरुदेव मामासाहेब दांडेकर आणि वै. ह. भ. प. अमृत महाराज नरखेडकर यांचा स्नेह बाबांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रभाव पाडणारा आहे. वयाच्या ९३ व्या वर्षीही बाबांचा जोश आणि उत्साह सर्वांना प्रेरणादायी आहे.
वारकरी सांप्रदायातील कार्य आणि आमदार महेश लांडगे यांच्याविषयी बोलताना पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असे सुरवातीलाच नमूद करून बाब म्हणाले, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी महेशरावांची प्रतिमा आहे. समाजात प्रबोधन घडवून आणण्यात आणि अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्यात वारकरी संप्रदायाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वारकरी संप्रदायाची आचार व विचार प्रणाली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानावर आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर आधारलेली आहे. या भक्तीमार्गी संप्रदायाने अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे.

वारकरी सांप्रदायाचा पाया रचण्याचे कार्य संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. तर, कळस होण्याचे भाग्य संत तुकाराम महाराजांना लाभले आहे. संत निवृत्तीनाथ, संत सोपान, संत नामदेव, संत एकनाथ, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत चोखोबा, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत सेना, संत नरहरी सोनार, संत बहिणा, संत निळोबा यांचे या परंपरेतील योगदान फार मोठे आहे. त्यामुळे टाळगाव-चिखली येथे संतपीठ निर्माण करण्याची प्रेरणा महेशरावांना मिळाली. त्याने मागतो ऐसे दान, भक्ती करी क्षीण या निरपेक्ष भावनेने संतपीठ साकारले. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना भक्ती ज्ञानाची कवाडे खुली झाली. त्या माध्यमातून विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या प्रवृत्तीचे दर्शन घडल्याचे बाबांनी म्हटले आहे.
महेश लांडगे यांचा स्वभाव अंतरी कोमळा, बाहेरी निर्मळा असा आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील अन्नदान असो, पवित्र इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प असो किंवा भिमाशंकर येथील भव्य सोहळा असो ते हिरिरीने पुढाकार घेतात. दरवर्षी कीर्तन व भजन महोत्सव आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातील किर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्यांचे हे कार्य म्हणजे योगयाग विधी नव्हे सिद्धी, वायाचि उपाधी दंभ धर्म यांसारखी म्हणता येईल. अर्थात, त्यांना मिळणारी प्रेरणा नक्कीच त्याच्या घराण्यातील शिकवणीमुळे मिळाली असावी. अन्यथा, भावेवीण देव नकळे निःसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे!
वेदान्ताचे खोटे प्रतिपादन करून समाजाचे शोषण करणारे विषयलंपट लोक आजही कमी नाहीत. मात्र, समता, बंधुता आणि मानवता मूल्यांची जोपासना करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम महेशरावांनी केले आहे. आळंदी-देहूचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी तीर्थक्षेत्र विकासाबाबत विधीमंडळात ठाम भूमिका घेतली आहे. तत्वज्ञानाची विवेकपरता, योग्याची निरामयता, संतांची भूतदया आणि साहित्यिकाची सौंदर्यदृष्टी हे गुण त्यांच्या ठायी एकवटले असल्याचे दिसून येते.
शांती परते नाही सुख असे जीवनाचे सूत्र मानणाऱ्या आणि साधकांची माउली म्हणून वारकरी संप्रदायात सु-परिचित असणाऱ्या मारोतीबुवांनी महेश लांडगे यांना आशिर्वाद दिले आहेत. ते म्हणजे – आशीर्वाद तया जाती, आवडी चित्तीं देवाची, कल्याण ती असो क्षेम, वाढे प्रेम आगळे, भक्तीभाग्यगाठीं धन, त्या नमन जीवासी, तुका म्हणे हरिचे दास, तेथे आस सकळ जय जय रामकृष्ण हरि, जय जय रामकृष्ण हरि !