फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

डुडूळगाव येथे एक लाख देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात!

डुडूळगाव येथे एक लाख देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात!

पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रम
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग पुणे व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून या मोहिमेचा प्रारंभ आज डुडूळगाव येथे महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या शुभहस्ते झाला.

avratra 8
avratra 8

याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, उप उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे, उद्यान निरीक्षक दादा गोरड, उद्यान सहाय्यक सचिन शिनगारे, शिवाजी बुचडे, प्रथमेश सीनकर, वन विभागाचे वनपाल शीतल खेंडके, प्रमोद रासकर, वनरक्षक अशोक गायकवाड, बाळासाहेब जीवाडे, अंकुश कचरे, कोमल सपकाळ, प्रिया आकेन, प्रीती नागले, ओंकार गुंड, अनिल राठोड, संगीता कल्याणकर, ह.भ.प. प्रभाकर महाराज मोरे, सामाजिक कार्यकर्ते वंदना वहिले, रमेश वहिले, हिरामण आल्हाट, नगाजी वहिले यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, उपस्थित होते.

यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, ‘वृक्ष म्हणजे मानवाचे खरे सोबती आहेत. देशी वृक्ष लागवड व संवर्धन करून भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी व निरोगी वातावरण मिळू शकते. येथील वसुंधरेला वाचविण्यासाठी देशी वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. देशी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते मोठे करण्याचा संकल्प करावा.’

दरम्यान, डुडूळगाव येथील मोहिमेमध्ये निसर्गाशी सुसंगत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, कडुनिंब, बहावा, पळस, उंबर, आवळा, साग, करवंद, शेवगा, जास्वंद, काटेसावर, बेल, अर्जुन, सिरिस, पांगारा, कांचन, हिजळ, पन्हाळ, खैर, शेवती, तामण, सोनचाफा, पारिजात, मोरिंगा, पांगळी, करवंद काटेरी, सावर, कडंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्ष स्थानिक हवामान व मातीला अनुरूप आहेत.

म्हणून देशी वृक्षांची केली जाणार लागवड
१. पर्यावरणीय संतुलनासाठी – देशी वृक्ष स्थानिक माती, पर्जन्यमान व हवामानाला सहज अनुरूप असल्याने त्यांची जोपासना सोपी होते. हे वृक्ष मातीची धूप थांबवतात, भूजलपातळी वाढवतात व हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यास मदत करतात.
२. जैवविविधतेसाठी आश्रयस्थान – पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे यांना देशी वृक्ष सुरक्षित अधिवास पुरवतात. या वृक्षांच्या फुला-फळांमुळे स्थानिक प्रजातींचे पोषण व संवर्धन होते.
३. औषधी व आरोग्यदायी गुणधर्म – नीम, आवळा, बेल, अर्जुन यांसारखे देशी वृक्ष औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून आरोग्यवर्धक आहेत. ग्रामीण व नागरी भागात पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
४. सांस्कृतिक व धार्मिक मूल्य – वड, पिंपळ, आंबा, बेल यांसारख्या वृक्षांना भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे. विविध धार्मिक विधी, सण व परंपरांमध्ये या वृक्षांचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते.
५. आर्थिक फायदे – आंबा, चिंच, जांभूळ, करवंद यांसारख्या फळझाडांमधून पोषणासह शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. तसेच लाकूड, औषधी पदार्थ, पाने, बिया यांचा विविध उद्योगांमध्ये उपयोग होतो.
६. शहरी भागासाठी उपयुक्त – देशी वृक्ष प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता अधिक असल्याने शहरी परिसरात ते हवा शुद्ध ठेवतात. छाया व हरितपट्टा निर्माण करून नागरिकांना आरोग्यदायी वातावरण देतात.

….

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"