शहराची दोन विभागातली वाटणी घातक : भोईर

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील काही राजकारण्यांनी शहराची दोन भागात वाटणी केली आहे. ती सुद्धा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी. पण शहराची अशा प्रकारे दोन विभागातली वाटणी भविष्यासाठी घातक आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाईसाहेब भोईर यांनी केली आहे.
निमित्त होते, भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसाचे. भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये भाऊसाहेब भोईर यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी घेतली.
त्यावेळी भोईर यांनी शहराला मिळालेला सांस्कृतिक चेहरा, औद्योगिक नगरीची सांस्कृतिक नगरी म्हणून झालेली ओळख या वाटचालीबद्दल मत व्यक्त केले. तसेच सुरू असलेली प्रशासकीय राजवट, पिंपरी चिंचवड शहराचा रखडलेला विकास, विकासात दिले जाणारे दुय्यम स्थान, शहरातील वाहतूक, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि पर्यावरण यावर परखड भाष्य केले.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, आजपर्यंत शहराच्या विकासाकडे येथील नेत्यांनी तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झालेले आहे. शहराच्या प्रश्नांना आजवरचे येथील आमदार जबाबदार आहेत. शहराचा विकास होत असताना, लोकसंख्या वाढत असताना त्यानुसार सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण होणे गरजेचे होते. मात्र, ते झालेले नाही. नद्यांची गटारगंगा झाली आहे. तर विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी फोफावली आहे. ठेकेदारांचे भले केले जात आहे. येथील राजकारण्यांनी शहराची दोन भागात वाटणी केली आहे. ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी. शहराची विविध प्रश्नातून सोडवणूक करण्याबरोबरच परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. वास्तविक जनतेच्या विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, येथील राजकारण्यांनी आजवर केवळ स्वतःचा विकास साधण्यात धन्यता मानली आहे असेही भाऊसाहेब भोईर म्हणाले.
या निमित्ताने मराठी भाषेतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बरोबरीने पहिल्यांदाच शहरात खान्देशी, अहिराणी, राजस्थानी, बंगाली आणि दाक्षिणात्य भाषांधले सांस्कृतिक कार्यक्रम झाले. संतोष पाटील, हरेश शेट्टी, सुदाम परब, हर्षवर्धन भोईर, गौरी लोंढे, विश्वास जोशी, राहुल भोईर, किरण येवलेकर, संतोष रासने, हिम्मत भाटी, विशाल रामावत, रमेश गेहलोत, श्याम सुवर्णा, बंडू सावंत, राजू बंग, आसाराम कसबे, अमित मंडल, अलोक सेन गुप्ता, बि. के. चॅटर्जी, विवेक क्षीरसागर, जितेंद्र पाटील, योगेश पाटील यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.