संतपीठावरील संचालकांच्या पात्रतेवर अजित गव्हाणे यांचे प्रश्नचिन्ह

भोसरी : भारतातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ पिंपरी-चिंचवडमधील ऐतिहासिक टाळगाव चिखलीत उभारण्यात आले. या संतपीठावरील संचालकांच्या पात्रतेवर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी जाहीर सभेत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यामुळे वारकरी संप्रदयात नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही जागांवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भोसरीतून अजित गव्हाणे, पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत आणि चिंचवडमध्ये राहुल कलाटे निवडणुकीच्या ‘तुतारी’च्या चिन्हावर रिंगणात आहेत.
भोसरीतील एका सभेमध्ये अजित गव्हाणे यांनी विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमदेवार महेश लांडगे यांना संतपीठाच्या मुद्यावर लक्ष्य केले. भाषणाला जोर चढला आणि ‘संतपीठावर ज्यांना संचालक केले आहे.. त्याचा इतिहास चेक करा… त्यांचे कॅलिबर तुमच्या लक्षात येईल’ असा गंभीर आरोप केला. त्यामुळे वारकरी सांप्रदाय आणि शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, आजच्या घडीला या संतपीठामध्ये १ हजार ६०० हून अधिक विद्यार्थी संतसाहित्य आणि आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला.
संतपीठाचे पदसिद्ध अध्यक्ष व मुख्य संचालक महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच संतपीठाचे संचालन करते. यासह संतपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे (देहुकर), आळंदी देवस्थान ट्रस्टचे माजी सदस्य, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ आणि संपादक, लेखक, अर्थतज्ञ असा लौकीक असलेले डॉ. अभय टिळक यांचा संतपीठाच्या संचालक मंडळामध्ये समावेश आहे. त्यामुळे अजित गव्हाणे आता तुकोबारायांचे वंशज, आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे ‘कॅलिबर’ म्हणजे पात्रता तपासणार आहेत का? असा संतत्प सवाल उपस्थित केला जात आहे.
किंबहुना, संतपीठ ही मूळ संकल्पना स्व. दत्ता साने यांची आहे. त्या संकल्पनेला मूर्तरुप आमदार महेश लांडगे यांनी दिले. संपतीठाच्या प्रस्तावापासून सल्लागार नियुक्ती, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, भूमिपूजन आणि लोकार्पण आणि आता संतपीठाचे यशस्वीपणे संचालन सुरू आहे. मात्र, अजित गव्हाणे यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि अभ्यासू नेता चुकीच्या माहितीच्या आधारे आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘‘तुका म्हणे ऐशा नरा… मोजुनी माराव्या पैजारा..’’ अशा संतत्प प्रतिक्रिया वारकरी सांप्रदाय आणि शिक्षण क्षेत्रातून येत आहेत. त्यामुळे संतपीठाच्या मुद्यावर गव्हाणेंचा ‘सेल्फ गोल’ झाला, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.