आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार

आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचे उद्घाटन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्वमान्यता मिळू लागली आहे. प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन व स्टार्टअप सुरु करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना देणार आहे. सर्वगुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे मध्ये आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन उद्घाटन प्रसंगी प्रतापराव जाधव बोल्ट होते. कार्यक्रमास कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सोसायटीच्या सचिव डॉ. स्मिता जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमेरिकास्थित शास्त्रज्ञ डॉ. टोनी नाडर, सचिव वैद्य मनोज नेसरी, वैद्य जयंत देवपुजारी, डॉ. भूषण पटवर्धन, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, डॉ. गिरीश मोमया, प्रा. डॉ. सुभाष रानडे, प्राचार्य डॉ. गुणवंत येवला आदी उपस्थित होते.
आयुर्वेद प्रसारासाठी डॉ. गुणवंत येवला आणि डॉ. वॉल्टर मोईल्क यांना ‘आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डॉ. संजीव गोयल, डॉ. अखिलेश वर्मा, डॉ. एस. एन. पांडे, डॉ. रामदास आव्हाड यांना सन्मानित केले. संशोधन संचालक प्रा. डॉ. अस्मिता वेले, कायाचिकित्सा विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. जी. दीपांकर, रचना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. योगेश कुट्टे यांनी परिश्रम घेतले. दहा देशातील १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि १२०० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, वैद्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. ५०० हून शोधनिबंध सादर झाले.
प्रतापराव जाधव म्हणाले, ‘ आयुर्वेदीय औषधांना, उपचारांना प्रभावी करण्यासाठी व मान्यता मिळण्यासाठी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळेच संशोधनावर भर दिला जात आहे. संशोधन व विकास केंद्राची उभारणी करण्याचा विचार सुरु आहे. अनेक औषधांना आयएसओ मानांकन दिले जात आहे. देशातही घराघरात आयुर्वेद जाण्यासाठी ‘देश का प्रकृती परीक्षण’ उपक्रम आणला असून, त्यामध्ये सव्वाकोटी लोकांची माहिती संकलित केली आहे.” डॉ. टोनी नेडर, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, डॉ. सुभाष रानडे, डॉ. गिरीश मोमया, डॉ. जयंत देवपुजारी यांनीही मनोगते व्यक्त केली. डॉ. लोथर पियार्क व डॉ. योगेश कुट्टे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गुणवंत येवला यांनी आभार मानले.