आयारामांमुळे निष्ठावंतांची कोंडी : अमोल थोरात

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून तसेच शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत दुही माजवली आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे भाजपाचे नेते अमोल थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्राव्दारे कळविले आहे. थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.
भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अमोल थोरात पत्रात म्हणाले, भाजपाचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांनी शहरात पक्षाचे कार्यकर्ते तयार केले. विपरीत परिस्थितीत भाजपाचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले. रवी लांडगे हे २०१७ मध्ये भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान, पिंपरी- चिंचवड भाजपमध्ये आयारामांचीही गर्दी झाली. यामध्ये अनेकांना चांगली पदे बहाल केली. त्यातील अनेकांनी पदांचा केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी वापर सुरू केला आहे. तसेच अंतर्गत गटबाजी करून पक्षामध्ये दुही माजवली आहे.
त्यामुळे पक्षामधील निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कोंडी होत आहे. त्याला कंटाळून काही पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी पक्षातून बाहेर पडण्यास पसंती दिली आहे. यात एकनाथ पवार यांच्या पाठोपाठ आता रवी लांडगे हे देखील शिवसेनेत गेले आहेत. लांडगे यांना पक्षाकडून संधी मिळाली नाही. तसेच अंतर्गत गटबाजी करून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक कुटुंब जोडण्यासाठी पक्षाला दोन ते तीन पिढ्यांपासून प्रयत्न करावे लागले. मात्र पक्षातील सध्याच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे हे कार्यकर्ते आणि कुटुंब पक्षापासून दूरावत आहेत. त्यामुळे भाजप शहर कार्यकारिणी तसेच कार्यकारिणीचे अध्यक्ष व शहरातील बडे पदाधिकारी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संघटन वाढविण्याऐवजी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर त्यांनी भाजपला नेऊन ठेवल्याचे दिसून येत आहे.’