निःस्वार्थी कार्याचा वसा!

- डॉ. निलेश लोंढे
आमदार महेशदादा लांडगे यांची आणि माझी ओळख पर्यावरणाच्या माध्यमातून झाली. मला झाडं लावण्याची आवड होती. इंद्रायणी नदी परिसरात झाडं लावणे आणि त्यांना वाढविण्याचा प्रयत्न करीत होतो. तेव्हा महेशदादांचे बंधू सचिन भैया यांच्या माध्यमातून महेशदादांशी संपर्क आला. आमची एकमेकांशी ओळख होऊ लागली होती. दादांना सुद्धा पर्यावरणाची आवड, सायकलिंगची आवड या माध्यमातून आम्ही आणखी संपर्कात येऊ लागलो. बऱ्याचदा सायकल राइड वगैरे आम्ही करायचो. दिघी डोंगरावर आम्ही झाडं लावायला सुरुवात केली होती. तेव्हापासून आमची ओळख आणखी वाढली. आमचे अगदी घरगुती नातेसंबंध आहेत. दादांच्या मातुःश्रींसाठी आयुर्वेदिक उपचार माझ्याकडे घेतले जात होते, त्यामुळे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले.

दादा आमदार असूनही पर्यावरणासाठी वेळ देतात, सायक्लोथॉनसाठी वेळ देतात; ही खरोखर कौतुकाची बाब आहे. सायकल राइडसाठी आर्थिक पाठबळही देतात. ही विशेष बाब आहे. अन्य नेत्यांसाठी फोटोपुरते वृक्षारोपण, असा दादांच्या कार्याचा भाग कधीच नव्हता. स्वतः कार्यासाठी उतरून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी धडपडताना मी त्यांना पाहिले आहे. आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दादांनी काम केले आहे. पर्यावरण आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रासाठी दादांचे योगदान मोठे आहे.
दिघी डोंगरावर वीस हजाराहून अधिक झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे, त्यांच्यासाठी खत, पाणी देणे, झाडांची होणारी हानी वाचविण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी आवश्यक ती सगळी मदत आतापर्यंत दादांनी केली आहे. डॉक्टरांचा झाडांसंदर्भात लढा होता, त्यासाठी सुद्धा दादांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. डॉक्टरांच्या ज्या समस्या आहेत, डॉक्टरांचे संरक्षण किंवा काही मागण्यांबाबत आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, फायर एनओसी संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो. अशा अनेक समस्या असतील की ज्या प्रश्नांची उत्तरे दादांकडे गेल्यानंतर आपोआप मिळू लागतात.
भावनिक आणि लढवय्या
महेशदादा बाहेरून जसे दिसतात तसे नाहीत. दादा खरंतर फार भावनिक आहेत. त्यांच्या कामात व्यावसायिकता कधी बघायला मिळणार नाही. कोणत्याही कामात त्यांनी स्वतःचा फायदा कधीच पाहिलेला नाही. स्वतःच्या मतदार संघापुरते काम ते करत नाहीत. स्वतःचा मतदार संघ सोडूनही त्यांनी कित्येक लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी मदत केली आहे, त्यासाठी स्वतःचा वेळ सुद्धा खर्ची पाडला आहे, यातूनच दिसतं की, दादांसाठी राजकारण दुय्यम आहे. पण समाजकारणाला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे माझ्यापुढे आहेत. एखाद्या व्यक्तीचा भविष्यात त्यांना काही उपयोग होणार नसेल, तरीही दादा त्या व्यक्तीसाठी झटून काम करतात. कोल्हापूरला आलेल्या पुरात दादांनी मदतीचा हात पुढे केला होता, हे त्याचं उत्तम उदाहरण.
खेड तालुक्यातील एक भगिनींचा मुलगा सैन्यात होता. तो मरण पावला. दादांनी त्या ताईंना आर्थिक मदत केली. तसंच भविष्यात कोणतीही अडचण आली तरी मदतीचे आश्वासन दिले, याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे अतिशय वेगळ्या दृष्टीकोनातून आपल्यामुळे इतरांच्या अडचणी सोप्या होत असतील तर दादा तिथे नक्की धावून जातात. समाजाप्रति आपले काही देणे आहे, याच भावनेने त्यांना काम करताना पाहिले आहे.
व्हिजन असलेला नेता..
नेत्याकडे व्हिजन असले पाहिजे, ही अपेक्षा आहे. नेत्याला एकाच दृष्टीकोनातून पाहून काम करता येत नाही. पाणी, रस्ते, नागरिकांच्या सोयी सुविधा, कचरा असे सगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना हाताळता आले पाहिजेत. भविष्याचा वेध नेत्याला घेता आला पाहिजे. भामा आसखेड प्रकल्प, कचऱ्याची विल्हेवाट, शहराचे सुशोभिकरण, क्रीडा क्षेत्राचा विस्तार, वकिलांसाठी उच्च न्यायालयाचा प्रयत्न, संतपीठासाठी प्रयत्न, शैक्षणिक विकासासाठी पुढाकार अशा सर्वंकष पातळीवर महेशदादा काम करताना दिसतात. एखादं काम झालं की ते थांबलेत असे नाही. तर त्यापुढे काय करायचे, याचा विचार त्यांच्या मनात लगेचच सुरू होतो. चऱ्होलीत आय टी पार्क त्यांनी जाहीर केले. आता नुसते आय टी पार्क होऊन उपयोग नाही. तिथे स्थानिकांना रोजगार मिळेल, भूमिपुत्रांना काम मिळेल, याची सोय ते नक्कीच करणार. आय टी पार्क हिंजवडीत झाले तेव्हा तिथल्या परिसररापुरताच विकास झाला, पण दादांच्या हातून तसे होणार नाही. चऱ्होलीचा सर्वंकष विकास करण्याचे ध्येय दादांचे असेल. त्यामुळे असा सर्वसमावेशक, सर्वंकष आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सोयी सुविधा पुरविणारा नेता पुन्हा हवा आहे.