तुम्ही आमचं आयुष्य व्यापलंत..

फक्त वाहन उद्योगातल्या मोटारीच नव्हेत तर खाद्यपदार्थ, पेय, कपडे, पायाभूत सुविधा, प्रवासी साधने, प्रवासी माध्यम, दागदागिने, जीवनशैली, अर्थकारण, मेटल्स – धातू, ई-कॉमर्स व्यवसाय, टेलिकॉम सेवा या सगळ्या क्षेत्रात जगभरात व्यवसाय उभा करून, त्याचा विस्तार करून तुम्ही जवळपास आमचं आयुष्यच व्यापून टाकलंत. आपल्या देशातला, आपल्या मातीतला माणून आपल्याला इतकं भरभरून देऊन गेला. इतकं, की ते सगळं पेलण्यासाठी आमची ओंजळही अपुरी पडेल. रतनजी टाटा, आज या भूतलावरून आमचा निरोप घेतला असलात तरी अखेर तुम्ही आमचं आयुष्य व्यापून गेलात.
सीमा देसाई
कित्येक घरात सकाळच्या पहिल्या चहापासून तुमच्याच नावाचा वावर दिसून येतो. यात अतिशयोक्ति नाही, पण सकाळच्या चहाच्या पावडरपासून दिवसाच्या अखेरपर्यंत प्रत्येकजण कित्येक टप्प्यांवर तुमच्या कंपनीची उत्पादने सहज वापरतो, आणि ते लक्षातही येत नाही. मला आठवतंय, भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा शाळेमधून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. आम्हाला प्रत्येकाला स्वदेशी वस्तूंच्या कंपन्यांची यादी देण्यात आली. बारकाईने पाहिलं तर जवळपास सगळ्या वस्तू टाटा समूहाच्या आहेत, हे लक्षात आलं आणि त्या वयातच कित्येकांना तुमच्या कार्याची महती समजली. परदेशातून उच्च दर्जा म्हणून येणाऱ्या प्रत्येक उत्पादनाला इथे स्वदेशी बनावटीचं आणि उत्तम दर्जाचं उत्पादन टाटा समूहाने तयार करून दिलं आहे.
नेतृत्त्व, दातृत्त्व, कर्तृत्त्व तुमच्या एकाच व्यक्तिमत्त्वातून झळकतं. सज्जन ही संज्ञा आजपर्यंत फक्त पुस्तकांमधून वाचत आलो. पण तुम्हाला कधीही न भेटलेल्या, तुमचा सहवास कधीही न लाभलेल्या कित्येकांना या सज्जन संज्ञेच्या रूपात निःसंदेह तुमचाच चेहरा दिसतो. रतन टाटा हे नाव उच्चारताच जगाच्या पाठीवर कोणाच्याही मनात फक्त आदर ही एकच भावना येऊ शकते.
भारतातल्या उद्योग जगतामध्ये असलेल्या स्पर्धात्मक युगाला सामोरं जात असतानाच समाजाप्रति आपण काही देणं लागतो, या जाणीवेची एक वात कायम मनात खोलवर तेवत ठेवत तुम्ही फक्त परोपराक करीत आलात. तुमच्या सहवासात येणाऱ्या अनेकांच्या मनात याच एका वातीतून असंख्य ज्योती प्रज्ज्वलित करण्याचा प्रयत्न केलात. उद्योगातून येणाऱ्या आर्थिक फायद्याबरोबरच वंचितांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न, त्यांच्याप्रति सहवेदना, परोपकारी वृत्ती, प्राणीमात्रांवर पराकोटीचं प्रेम आणि माणसातलं माणूसपण जपणारा माणूस या सगळ्या गुणांचं एक अनोखं नातं रतन टाटा या व्यक्तिमत्त्वाशी बांधलं गेलं होतं.

रतनजी टाटा यांचं निधन झाल्याची बातमी ९ ऑक्टोबरला रात्री उशीरा वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्ट वेगाने व्हायरल झाल्या. त्यापैकी एक म्हणजे टाटा समूहाच्या सगळ्या क्षेत्रातल्या उद्योगांबद्दलची माहिती देणारं एक ग्राफिक मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड झालं. ते पाहिल्यावर लक्षात आलं की, किती प्रचंड काम करून ठेवलंय या व्यक्तीने. साधारणपणे भारतात लाभणारं आयुर्मान पाहिलं तर रतन टाटा यांनी त्यांना लाभलेल्या आयुष्यात जगभरातलं उद्योग क्षेत्र व्यापून टाकलं. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील, सामाजिक आयुष्यातील कळत नकळत त्यांच्या वागणुकीतून दिसलेलं देशाबद्दलचं, समाजाबद्दलचं प्रेम, परोपकार, माणुसकी, सद्भावना हे सगळं आपण काही टक्के अंगिकारू शकलो तरी धन्य!