कानपूर : कानपूरमध्ये टीम इंडियाने असा चमत्कार घडवला जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकून बांगलादेशचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा व्हाईटवॉश केला. अशा प्रकारे भारताने घरच्या मैदानावर नवा इतिहास लिहिला आहे. भारताने पहिल्या कसोटीत २८० धावांनी विजय मिळवला होता आणि आता दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव करून मायदेशात मोठी कामगिरी केली. घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग १८ वा मालिका विजय आहे.
कानपूर कसोटीत पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला. यादरम्यान बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १०७ धावा केल्या. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही, मात्र चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला २३३ धावांत गुंडाळले. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने चौथ्या दिवशी डावाची आक्रमक सुरुवात केली आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ५०, १०० आणि २०० धावा करण्याचा पराक्रम केला. भारताने पहिला डाव २८५/९ धावांवर घोषित केला.
बांगलादेशचा २-० ने उडवला धुव्वा –
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशचा संघ केवळ १४६ धावाच करू शकला, त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय डावाची सुरुवात धमाकेदार झाली पण रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलही ६ धावा करून माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी पदभार स्वीकारला आणि अशा प्रकारे भारताने सामना तसेच मालिकेवर कब्जा केला.
मायदेशात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. भारताने गेल्या १२ वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने शेवटची कसोटी मालिका २०१२ मध्ये घरच्या मैदानावर गमावली होती. त्यानंतर इंग्लंडने भारतीय संघाचा २-१ असा पराभव केला होता. या मालिकेपासून टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. गेल्या १२ वर्षात भारताने मायदेशात सलग १८ कसोटी मालिकेत विरोधी संघाचा पराभव केला आहे.