गरज लागल्यास नागरिकांना एअर लिफ्ट करणार

पुणे, प्रतिनिधी : पुणे: रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्यानं पुण्यातील स्थिती गंभीर आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पुण्यातील काही भागांमध्ये पाणी साचल्यानं रहिवासी अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. वेळ पडलीच तर आम्ही रहिवाशांना एअरलिफ्ट करु. यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यात आलेला आहे. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पुण्यातील अनेक भागांत अक्षरश:छातीपर्यंत पाणी भरलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या. जवळपास पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं. एकतानगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी घुसलं असून घरातील सर्व सामान पाण्याखाली गेलं आहे. घरात पाणी घुसून गाद्या भिजल्या आहेत, तर अनेक सामान पाण्यासोबत वाहून गेलं आहे. नागरिकांना सुखरुप घरातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी दाखल झाल्या आहेत.पुण्याचे रस्ते जलमय झाले असून गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. कोयना धरणक्षेत्रात सेकंदाला ७५ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या १० हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.
नागरिकांनी आपल्या सुरक्षेचा काळजी घ्यावी. घाबरुन जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. ‘पुणे जिल्हाधिकारी, पुण्याचे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, लष्कराचे कर्नल यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरु आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.