तूप कोणी खाऊ नये?

प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे तूप. साधी पोळी असो वा पुरणपोळी किंवा अगदी पराठे, लाडू, खिचडी या सगळ्यामध्ये तुपाचा वापर आपण करतो. तुपात व्हिटॅमिन्स आणि अँटी ऑक्सिडन्ट असतात. यामुळं केस, त्वचा आणि हाडांना खूप उपयोग होतो. तुपात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि अन्य बरीच पोषक तत्त्व असतात; ज्यातून शरीराला ऊर्जा मिळण्याबरोबर शारीरिक संतुलन राखण्यासाठी मदत होते.
भारतीय खाद्य संस्कृतीत कोणत्याही प्रांतात आहारामध्ये तुपाचा वापर सढळ हाताने केलाला दिसेल. साध्या वरणभातापासून पुरणपोळी, उकडीचे मोदक, पराठे, दालबाटी, रस्सम या सगळ्यात तूप हे हवंच. मूल जन्माला आलं की वरचं अन्न सुरू केल्यानंतर पहिला घास पोटात जातो तो मऊभात, तूप असाच. त्यामुळं पुढं आयुष्यभर जेवताना तूप घ्यायचं, ही सवयच भारतात सगळ्यांना असते. पण हेच तूप खाणं कोणासाठी धोकादायकही होऊ शकतं. प्रत्येकालाच भरपूर आणि मनापासून तूप खाल्लेलं चालेलच असं नाही.
कोणासाठी तूप धोकादायक?
ताप, सर्दी, खोकला हे किरकोळ आजार सर्वसाधारण ऋतू बदलानुसार सगळ्यांना कधी ना कधी तरी होत असतात. ताप आला असल्यास तूप खाऊ नये. ज्या लोकांना उच्च रक्तदाब, हृदय विकार, मधुमेह, स्थूलता, किंवा अन्य काही आजार असतील तर अशा लोकांसाठी तूप खाणं धोकादायक ठरू शकतं, असं वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.
आरोग्यासाठी कसं हानिकारक?
तुपामध्ये मोठ्या प्रमाणावर लिपिड्स आणि कोलेस्ट्रॉल असतं. सामान्यपणे कोणाच्याही आरोग्यासाठी हे हानिकारक ठरू शकतात. साधारणपणे एक चमचा तुपात 8 ग्रॅम फॅट आणि 33 ग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं. मोठ्या प्रमाणावर तूप खाल्ल्यामुळं हृदयविकाराचा झटका, वजन वाढणं, मधुमेह, पचनाचे विकार, कॅन्सरसारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं जास्त तूप खाणं टाळावं आणि तंदुरुस्त रहावं.
तुपामुळं नुकसान?
तूप शरीरासाठी उपयुक्त असतं. मात्र, त्यामुळं काही नुकसानही होऊ शकतं. तुपात जास्त फॅट आणि कोलेस्ट्रॉल असतं. त्यामुळं हे हृदयासाठी हानिकारक ठरू शकतं. याखेरीज महिलांनी गर्भारपणाच्या काळात तूप खाण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. या काळात जर वजन जास्त वाढत असेल तर तूप आजिबात खाऊ नये. निरोगी राहण्यासाठी आपण दिवसभरात कमीत कमी 4 ते 5 चमचे तूप खाल्लं पाहिजे. यापेक्षा जास्त तूप खाल्लं गेलं तर आजार होण्याची शक्यता वाढू शकता.