बन्ट् वॉरीयर्स आणि नायर ईगल्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

पहिली ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ महिलांची टी-२० क्रिकेट स्पर्धा
बन्ट् वॉरीयर्सची अमानी नदाल सामनावीर ; रविवार 26 एप्रिल रोजी अंतिम लढत
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पहिल्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत बन्ट् वॉरीयर्स आणि नायर ईगल्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

बन्ट् वॉरीयर्सचा केवळ एका धावेनी विजय
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या उपांत्य फेरीत अमानी नदाल हिने केलेल्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर ऐश्वर्यम चॅलेंजर्सवर बन्ट् वॉरीयर्सने केवळ एका धावेनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बन्ट् वॉरीयर्सने २० षटकात ३ गडी गमावून १३९ धावांचे लक्ष्य उभे केले. अमानी नदाल हिने नाबाद ६९ धावा करून डावाला आकार दिला. ऋतुजा गिलबिले (२० धावा) आणि अर्णवी शिंदे (नाबाद २६ धावा) यांनी धावा जोडल्या. अमानी हिने अर्णवी हिच्यासाथीत चौथ्या गड्यासाठी ७० चेंडूत ६१ धावांची भागिदारी रचली.
मोक्याच्या क्षणी ऐश्वर्यम संघाचे फलंदाज बाद
या धावसंख्येचा पाठलाग करताना ऐश्वर्यम चॅलेंजर्सचा सुरेख सुरूवात केली. जान्हवी पोळ (३८ धावा) आणि अमिता आर्या (३७ धावा) यांनी ५४ चेंडूत ६७ धावांची सलामी दिली. त्यानंतर जान्हवी हिने नीती अगरवाल (२८ धावा) हिला साथीला घेत दुसऱ्या गड्यासाठी ४७ चेंडूत ५७ धावांची भागिदारी रचली. शेवटच्या चार षटकांमध्ये ऐश्वर्यम संघ ११४ धावांवर १ बाद अशा सुस्थितीत होता आणि विजयासाठी २६ धावांची आवश्यकता होती. अर्णवीने टाकलेल्या या षटकात जान्हवी हिची महत्वपूर्ण विकेट मिळवली आणि बन्ट् वॉरीयर्सने विजयासाठीचे दार ठोठावले. १८ चेंडूत २० धावा; १२ चेंडूत १३ धावा आणि अखेरच्या षटकामध्ये विजयासाठी ७ धावा अशी सामन्याची समीकरणे बदलत गेली. मोक्याच्या क्षणी ऐश्वर्यम संघाने फलंदाज गमावले होते. श्रेया जगदाळे हिने अखेरच्या षटकाची जबाबदारी घेतली आणि पहिल्या तीन चेंडूत केवळ १ धावा दिली. चौथ्या चेंडूवर श्रेया हिने स्वतःच्याच चेंडूवर धावबाद घेतला आणि दोन चेंडूवर विजयासाठी सहा धावा, असे ऐश्वर्यम संघासाठी समीकरण होते. पुढील दोन्ही चेंडूंवरती केवळ चार धावा देत केवळ एका धावेने श्रेया हिने बन्ट् वॉरीयर्स संघाला अंतिम फेरी गाठून दिली.
सामन्यांचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
बन्ट् वॉरीयर्सः २० षटकात ३ गडी बाद १३९ धावा (अमानी नदाल नाबाद ६९ (६८, ८ चौकार), ऋतुजा गिलबिले २०, अर्णवी शिंदे नाबाद २६, सहेज कौर १-१६); (भागिदारीः चौथ्या गड्यासाठी अमानी आणि अर्णवी यांच्यात ६१ (७०) वि.वि.
ऐश्वर्यम चॅलेंजर्सः २० षटकात ६ गडी बाद १३८ धावा (जान्हवी पोळ ३८, अमिता आर्या ३७, नीती अगरवाल २८, रूची दहीफळे १-१९, अर्णवी शिंदे १-६); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी जान्हवी आणि अमिता ६७ (५४); दुसऱ्या गड्यासाठी जान्हवी आणि नीती यांच्यात ५७ (४७);
सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः अमानी नदाल; फायटर ऑफ द मॅचः जान्हवी पोळ.

