प्रश्न विचारणे हे विचारशीलतेचे लक्षण : सुहास हिरेमठ

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तरे’ पुस्तकाचे प्रकाशन
पिंपरी : प्रश्न विचारणे हे विचारशीलतेचे आणि बौद्धिक प्रगल्भतेचे लक्षण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय व भारतीय विचार साधना, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. गिरीश आफळे लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तरे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रम निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सभागृहात पार पडला.

सुहास हिरेमठ यांनी सांगितले की, वेदकाळापासून आपल्या संस्कृतीत प्रश्नोत्तरांची समृद्ध परंपरा आहे. संघस्थापनेपासून संघावर प्रश्न विचारले गेले असून, संघाने कधीही प्रश्नांना नकार न देता समर्पक उत्तरे दिली आहेत. संघ समजून घेण्यासाठी तो अनुभवावा लागतो. गांधीहत्येनंतर संघावर झालेल्या तीव्र विरोधाचा उल्लेख करीत, निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांच्या बळावर संघ आजही भक्कमपणे उभा असल्याचे त्यांनी नमूद केले.
एस. एन. बी. पी. शिक्षणसंस्थेचे संस्थापक – सचिव डॉ. दशरथ गोखले यांनी आपल्या अनुभवांतून संघ ही माणूस घडवणारी विचारांची शाळा असल्याची भावना व्यक्त केली. लेखक डॉ. गिरीश आफळे यांनी पुस्तकात संघाविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या सुमारे ६२ प्रश्नांची उत्तरे समाविष्ट केल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाला संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, भारतीय विचार साधनाचे कार्यवाह काशिनाथ देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरस्वती व अखंड भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. संपदा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीराम काळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

