फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण जगात सर्वोत्तम आदर्श राजे : बानुगडे पाटील

छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण जगात सर्वोत्तम आदर्श राजे :  बानुगडे पाटील

छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधनपर्व २०२५ चे उद्घाटन
पिंपरी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा आणि व्यापक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शाहिरी,व्याख्यान,३०० कलाकारांचे महानाट्य,कवितेतून समाज प्रबोधन अशा विविध कार्यक्रमांना शहरवासियांनी आणि विशेषत: युवा पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा जोपासावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५ चे आयोजन निगडी येथील शक्ती-शक्ती चौक, अ प्रभाग जवळील नियोजित महापौर निवास मैदान, चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर,डांगे चौक,थेरगाव तसेच पिंपरी येथील एच. ए. कॉलनी या ठिकाणी १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन काल निगडी येथील भक्ती शक्ती येथे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शाहीर रामानंद उगले यांनी “शाहिरीतून शिवदर्शन ” या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेजस्वी विचार तसेच प्रेरणादायी जीवनावर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली, त्यांना वडील आप्पासाहेब उगले यांनीही साथ देत आपली शाहिरी सादर केली.

त्यानंतर प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी ‘’असे होते छत्रपती शिवाजी महाराज’’ या विषयावर व्याख्यान सादर केले. यावेळी ते म्हणाले, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके त्यांनी केलेल्या तेजस्वी कार्यामुळे दिसतील. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही मग ते कोणत्याही प्रांतातील असो, स्त्रीयांचा सन्मान करा,परस्त्री मातेसमान असते अशी अनेक मुल्ये महाराजांनी पुढच्या पिढीला दिली. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बजावलेल्या कर्तव्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. प्रत्येकाला न्याय मिळेल असे स्वराज्य स्थापन करून प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या तेजस्वी कार्यामुळे केवळ देशात नाही तर संपुर्ण जगात त्यांना सर्वोत्तम आदर्श राजे म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या व्यापक कार्याचे, आणि इतिहासाचे पठण जर आजच्या पिढीने करायला हवे असेही ते म्हणाले.

यावेळी माजी नगरसदस्य सचिन चिखले, मारूती भापकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य आपत्ती व व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेद्र शिंदे,नितिन देशमुख, बापूसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाहिर अंबादास तावरे,भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, नकुल भोईर, सागर तापकीर, बालाजी दानवले, दत्ताभाऊ देवतरासे, तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारूती भापकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी आणि आभार प्रदर्शन सचिन चिखले यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"